महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारती भग्नावस्थेत, मोडकळीस व पडायला आलेल्या आहेत, त्या वास्तू काढून टाकण्याची किंवा दुरुस्ती करण्यास जाहीर सूचना देण्यात आली आहे.
बार्शी नगरपरिषद हद्दीतील सर्व इमारत मालक, भोगवटदार, भाडेकरू यांना कळविण्यात येते की, लवकरच पावसाळा चालू होणार असून, अवकाळी पाऊस, मान्सूनचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जुन्या/मोडकळीस आलेल्या, भग्नावस्थेत व धोकादायक स्थितीत असणाऱ्या इमारती पडण्याचा संभव आहे.
बार्शी नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारती भग्नावस्थेत, मोडकळीस व पडायला आलेल्या आहेत, त्या इमारतींचे मालक, भोगवटदार, भाडेकरु यांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम-१९५ अन्वये वास्तू काढून टाकण्यास किंवा दुरुस्ती करण्यास जाहीर सूचना देण्यात येत आहे.
याउपरही अशा इमारतीमुळे कसलीही जीवित हानी किंवा वित्तहानी झाल्यास मालक, भोगवटादार, भाडेकरु जबाबदार राहतील व त्यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. होणाऱ्या दुर्घटनेस नगरपरिषद जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
बार्शी शहरात लेंडीनाल्याकाठी अनधिकृतपणे राहणाऱ्या नागरिकांना सुचित करण्यात येते की, लवकरच पावसाळा सुरु होणार असून, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा संततधार पावसामुळे लेंडीनाल्यास पूर येण्याचा संभव आहे.
करिता पावसाळ्यापूर्वी लेंडीनाल्याच्या काठावरील अनाधिकृत झोपडया/घरे स्वखर्चाने इतरत्र हलविण्याची व्यवस्था करुन, कसलीही जीवित हानी किंवा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
पासाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर येऊन अनाधिकृत झोपडया/घरे व त्यात राहणारे नागरिकांचे आर्थिक नुकसान व जीवित हानी झाल्यास, त्यास बार्शी नगरपरिषद, बार्शी जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी असेही बाळासाहेब चव्हाण यांनी कळवले आहे.
