मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर गुन्हे दाखल करा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भूम नगर परिषदेमार्फत शहरातील गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरमध्ये पायऱ्याच्या बाजूला रेलिंग नसल्याने पंधरा फुट खालीपडल्याने महिलेचा मृत्यू झाला. यामहिलेच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असुन नगरपरिषद अभियंता मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे.
नगर परिषदेमार्फत शहरातील गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. शॉपिंग सेंटर बंद असताना खाली तळमजला बांधण्यात आला. व पहिल्या मजल्यावर व्यापारी गाळे बांधण्यात आले.
गुरुवारी (दि.६) संध्याकाळी भूम शहरात राहणारी हिराबाई पोत्रे (वय अंदाजे 65 ते 70 वर्ष) कॉम्प्लेक्स मध्ये जात असताना पायऱ्याच्या बाजूला रेलिंग नसल्याने पंधरा फूट खाली पडल्या. तेथील व्यापाऱ्यांनी त्यांना तात्काळ भूमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पुढील उपचारासाठी त्यांना धाराशिव येतील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असुन नगरपरिषद अभियंता मुख्याधिकारी व कंत्राटदार यांनी शॉपिंग सेंटर बांधत असताना नागरिकाच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही.
15 फूट तळमजला असतानाही त्या ठिकाणी कोणतीही रेलिंग बांधण्यात आलेली नाही. या अगोदरही एका अज्ञात व्यक्तीचा वरून पडून मृत्यू झालेला होता. याबाबतीत वेळोवेळी तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.
जो तळमजला बांधण्यात आलेला आहे तो बेकायदेशीर असून शासनाच्या पैशाची उधळपट्टी करून अनाधिकृतपणे बांधण्यात आलेला आहे. तसेच सदरील अनधिकृत मजल्याच्या वर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्याच कारणाने एका निष्पाप वृद्ध महिलेचा जीव गेलेला आहे.
अर्धवट असणाऱ्या इमारतीचे हस्तांतरण करून घेतल्यामुळे व तसेच सदरील अर्धवट असणारी इमारत हस्तांतरण साठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देणारे नगर अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे गेलेला आहे.
त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. इमारतीचे अर्धवट काम असताना हस्तांतरण करून घेणारे तत्कालीन मुख्याधिकारी, आणि संबंधित नगरपरिषद अभियंता यांनी ही इमारत व्यापाऱ्यांसाठी खुली केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे.
या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या नगरपरिषद अभियंता, नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन भूम शहर सर्वपक्षीय यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी भूम यांच्यामार्फत जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेले आहे.
या निवेदनावर काँग्रेस तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक रुपेश आप्पा शेंडगे, युवा नेते आबासाहेब मस्कर, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष ऍड सिराज भाई मोगल, एडवोकेट पाशा शेख, अमोल सुरवसे,महादेव जाधव, गणेश साठे, सचिन बारगजे, शंकर खामकर, आधी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
