दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बार्शीत सत्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : आता सध्या सर्व क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे.अकॅडमीक स्पर्धेमध्ये वाढ निर्माण झाल्यामुळे आपल्याला प्रचंड कष्ट व मेहनत करावी लागेल, मगच यश आपल्याला मिळेल असे प्रतिपादन अप्पर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील यांनी केले.
येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या इयत्ता १० वी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्तेगुणवत्ता विकास प्रकल्पांतर्गत संत तुकाराम सभागृह येथे सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अविनाश नेताजी सोलवट होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील हे होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव पी. टी. पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमातील अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी करून दिला.
यानंतर प्रमुख पाहुणे संतोष पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले सर्वश्रेष्ठ विद्यार्थी घडवणे हे या संस्थेची परंपरा आहे. आता सध्या सर्व क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. अकॅडमीक स्पर्धेमध्ये वाढ निर्माण झाल्यामुळे आपल्याला प्रचंड कष्ट व मेहनत करावी लागेल मगच यश आपल्याला मिळेल.
जास्त पैसा कमवणे म्हणजे जीवन नाही. जीवनात आनंदी राहायला शिका. ताण-तणावाचे नियोजन करता आले पाहिजे. जेणेकरून पुढील काळात आत्महत्या होणार नाहीत. योगासने, पुरेशी झोप, ध्यानधारणा व प्राणायाम विद्यार्थिनी केले पाहिजे.
विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सोबत तुलना करू नये. प्रत्येकाने आपल्या जीवनात भरपूर चांगले मित्र करावेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला अध्यात्माची जोड द्यावी असे सांगितले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून चांगले मोठे अधिकारी घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना अविनाश सोलवट म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्याला मदत करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा स्वतःला मी सर्वोत्तम आहे असे म्हणावे. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन आपण कसे सर्वोत्तम होऊ शकतो याबद्दलची मार्गदर्शन केले.
जे काय करायचे ते आधी ठरवा की त्यानुसार आपली दिशा ठरवा. आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीवर ठाम असावे. चांगला आहार व मानसिक दृष्ट्या सक्षम बना असे त्यांनी सांगितले.
यानंतर इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्त करण्यात आला.
सोबत संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही.एस. पाटील, संस्था सदस्य सी.एस. मोरे, दिलीप मोहिते, बी.के. भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक.एस.सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक,सर्व पालक, सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे व सुहासिनी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव ए.पी.देबडवार यांनी केले.
