खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले देठे कुटुंबियांचे सांत्वन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पुण्यात भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बार्शी येथील रहिवासी असलेले प्रसाद देठे यांनी मराठा समाजास आरक्षण न दिल्या कारणाने आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक आंदोलन, रस्ता रोको वेळी प्रसाद देठे हे सक्रिय राहून समाज बांधवांसाठी काम करत होते. त्यांच्या राहत्या घरी जाऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रसाद देठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
तसेच कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. मराठा समाजातील तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. आत्महत्या आरक्षण मिळविण्याचा पर्याय असू शकत नाही. तसेच आपल्या पाठीमागे कुटुंबीय आहेत याचा जरूर विचार करावा अशी कळकळीची विनंती खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी समाज बांधवांना केली आहे.
