महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धायरी गावातील एका सोसायटीतील तरुणावर दुचाकीवरील सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी (३ जुलै) रात्री घडली. याबाबत संदीप चव्हाण (वय २५ रा. धायरेश्वर मंदीरा मागे, पोकळे वस्ती धायरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
संदिप चव्हाण राहत असलेल्या बिल्डींग जवळील सिल्व्हरनेष्ट सोसायटीच्या समोरील रस्त्याच्या कडेला, फिर्यादी व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले असताना तेथे चार मोटर सायकल वरुन सात ते आठ अनोळखी इसम हातामध्ये लोखंडी हत्यारे घेऊन आले.
त्यामुळे फिर्यादी व त्यांचे मित्र घाबरुन शेजारील सोसायटीमध्ये पळुन गेले. पळत असताना फिर्यादी हे सोसायटीच्या मागील वॉल कंपाऊंड च्या जवळ पाय घसरुन पडले. त्यावेळी फिर्यादी यांचा पाठलाग करणारे सात ते आठ अनोळखी इसम तेथे आले.
त्यातील एक जणाने फिर्यादी यांना मन्या कोठे आहे असे विचारले असता फिर्यादी यांनी माहित नसल्याचे सांगितले असता त्यांनी त्यांचे हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्याला, दोन्ही पायाला, डाव्या हाताला मारुन, उजव्या पायाच्या नडगीला फॅक्चर करुन, डाव्या हाताचे दुसरे बोटावर वार करुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हा तपास पो. उप निरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.
