युवकांना मिळाला मानव कल्याणाचा प्रेरक संदेश
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दुःखमुक्ती म्हणजे मोक्ष आहे ही सोपी व्याख्या युवकांनी लक्षात ठेवावी. ज्या कामातून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो ते काम आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे ठरते. म्हणूनच मानवकल्याणाचे काम करण्यासाठी आपण पुढे यायला हवे. तोच मार्ग आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री आचार्य प. पु. चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने ‘अ वे फाॅरवर्ड फाॅर इनर डेव्हलपमेंट’ या विषयावर खास युवकांसाठी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात युवकांनी आपल्या मनातील विचार मोकळेपणाने मांडले आणि त्याचवेळी पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी आणि प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांच्याकडून प्रेरक विचारही जाणून घेतले.
‘जगभरात मानवतेचा प्रसार – मोक्ष मिळवण्याचा मार्ग’ या विषयावर युवकांचा एक गट सहभागी झालेला होता आणि त्यांनी आपले विचार प्रदर्शित केले. प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, सर्वसामान्यतः अशी धारणा असते की साधना, तपश्चर्या, ध्यानधारणा करूनच मोक्ष मिळवता येऊ शकतो परंतु मानवतेचा प्रसार करूनसुद्धा आपण मोक्ष मिळवू शकतो ही एक नवीन दृष्टी आपल्याला ताई माँ यांनी दिलेली आहे.
त्यावर आज युवक विचार करून आपली मते प्रदर्शित करीत आहेत याचा खूप आनंद आहे. सहभागी झालेल्या तरुणांसाठी हा विषय काहीसा अवघड असला तरी त्या दृष्टीने युवकांनी अभ्यास केला आणि आपले विचार प्रदर्शित केले. मानवतेची किती कामे करता येऊ शकतात याचा विचार या निमित्ताने सुरू झालेला आहे.
एकमेकांना मदत करून आपण एकमेकांचे जीवन समृद्ध करू शकतो, मानवतेचे काम करण्यासाठी तुमचे मन स्वच्छ आणि सुंदर असणे गरजेचे आहे. आनंद आणि कृतज्ञता यांचा प्रसार आपण सर्वांमध्ये करायला हवा, आपल्या मनात सहवेदना जागी होणे आवश्यक आहे.
कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता मदत करत राहा असे उत्तम विचार युवकांनी या निमित्ताने मांडले. आपल्या मनातील शंकाही युवकांनी अगदी मोकळेपणाने प. पु. पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांना विचारले. त्यांनीही युवकांना समजतील अशा सोप्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मोक्ष म्हणजे दुःखापासून मुक्ती.
जीवनात आपल्याला जे दुःख, पीडा, त्रास भोगावे लागतात त्यापासून मुक्त होण्याचा प्रवास म्हणजे मोक्ष असतो. युवक आपल्या धर्माच्या प्रसारासाठी कसे योगदान देऊ शकतात या विषयावरही युवकांनी चिंतन केले आणि त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करण्यात आले. हा एकूणच कार्यक्रम युवकांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारा ठरला.
