शिवशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पुणे येथे सन्मान सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : ग्रामचळवळ व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ॲड. विकास जाधव यांना कोल्हापूरच्या आविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय ‘ यशवंत गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पुणे येथे हा सन्मान सोहळा पार पडला. अविष्कार फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकासात व ग्रामचळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी यशवंत गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.
यावर्षीचा महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेला यशवंत गौरव पुरस्कार बार्शीचे ॲड. विकास जाधव यांना दिला. जाधव यांना सरपंच पदावर कार्यरत असताना कळंबवाडी गावात स्मार्टग्राम सह आदर्श सरपंच व इतर १७ पुरस्काराने सन्मान झालेला आहे तसेच सरपंच परिषदेच्या स्थापनेपासून राज्यभरात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामविकासाच्या संकल्पना रुजवणे, सरपंच, उपसरपंच यांचे संघटन करून त्यांच्या न्याय, अधिकारासाठी लढा देणे यासाठी गेले अनेक वर्षे त्यांनी निस्वार्थपणे काम केले आहे.
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारसह जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावरही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण भागाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घेतली. वेळप्रसंगी अनेक आंदोलने उभा केली सरकार विरोधी भूमिका घेतली.
राज्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना संघटित करून त्यांच्या हक्क अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले. सरपंचांचा मान व सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न केला. सरपंचांना व उपसरपंचांना मानधन मिळवून देण्यात जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यामुळेच राज्यातील सरपंचांच्या व उपसरपंचांनी विकास जाधव यांना सरपंच हृदयसम्राट ही पदवी बहाल केलेली आहे. या कार्याची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशनने या वर्षीचा ग्रामविकासातील सर्वात मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी सुप्रसिद्ध लेखक सुरेश पाटोळे, आविष्कारचे अध्यक्ष संजय पवार, व्याख्याते सचिन वायकुळे, फुलचंद चाटे, धनंजय भावलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.