वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेतून प्रेरक विचारधन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सर्वांत प्रभावी इंद्रिय हे कान आहे. कारण शब्द ही अतिशय सूक्ष्म शक्ती असून ते कानाद्वारे आपल्या मनात उतरतात. त्यामुळे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा ते प्रथमतः मेंदूमध्ये जाऊन संदेश देतात. एकेक शब्द समजून घेण्याची अतिशय सूक्ष्म प्रक्रिया मनाच्या पातळीवर घडत असते. शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा ते शरीरात मनापर्यंत पोहोचतात. मन सोबत नसेल तर शब्दांचा अर्थ लागूच शकत नाही. त्यामुळे प्रभाव ओळखायला शिका असे मार्गदर्शन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला चातुर्मासनिमित्ताने आयोजित केली आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या म्हणाल्या जे काही कर्म कराल त्याचे परिणाम होतात. जेव्हा आपण क्रोध करतो तेव्हा त्याचा रंग शरीरात जाऊन बसतो. त्याचा अंश, परमाणू आपण आपल्या शरीरात घेतो.
अशाच प्रकारे माया, लोभ, आसक्ती या सगळ्या गोष्टी आपण शरीरात घेत राहतो. आपल्या मनाद्वारे व इंद्रियांद्वारे आपण त्यांना ग्रहण करून आपल्या शरीरातील तिजोरीत साठवून ठेवतो. एखादी मशीन आपण चालू करतो आणि बंद करतो त्याप्रमाणे आपल्या शरीररुपी यंत्रावरही आपले नियंत्रण हवे. इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे.
काय पाहायचे नाही, काय ऐकायचे नाही हे आपण मनाशी ठरवायला हवे. जिथे अधिक सुविधा असतात तितका अधिक उपद्रव होण्याची शक्यता असते. आपल्या मनावर, जीवनावर आपण जे ऐकतो त्याचा सर्वाधिक प्रभाव पडतो. परंतु मंत्राची ध्वनी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व जगात वलयाच्या रुपाने पडतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येतात.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, घरातील सगळ्या गोष्टींचे अधिकार हे घरातील मालकाला असतात. त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा एक घर आहे आणि त्याची मालकी आपल्या स्वतःकडेच असते. मी जेव्हा या शरीरात असतो तेव्हा या शरीररुपी घराला पंचेद्रियांच्या पाच खिडक्या आहेत. स्पर्शज्ञानातून आपण जगातील फार मोजक्या गोष्टी जाणू शकतो.
रसेंद्रियातूनचही मर्यादीत स्वरुपाच्या गोष्टींचे ज्ञान होते. नाकाच्या माध्यमातून आपण गंध घेतो. त्यातून कितीतरी चांगले सुगंध आणि विविध प्रकारचे वास आपण घेऊ शकतो. डोळ्यांच्या माध्यमातून आपल्याला जगाचे दर्शन होते. सूर्य, तारे, नद्या, डोंगर, सभोवताल हे सारे आपल्याला दिसतात त्यामुळे डोळ्यांचे महत्त्वही मोठे आहे.
ऐकता येत असल्याने आपण आजुबाजूचे आवाज ऐकू शकतो आणि त्यातून आपल्याला बाहेरचे जग समजायला मिळते. सर्वांत प्रभावी इंद्रिय हे कान आहे. कारण शब्द ही अतिशय सूक्ष्म शक्ती असून ते कानाद्वारे आपल्या मनात उतरतात.
त्यामुळे स्तोत्रांचा प्रभाव आपल्यावर कसा प्रभाव पडतो हे समजून घ्यायला हवे. शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा ते शरीरात मनापर्यंत पोहोचतात. मन सोबत नसेल तर शब्दांचा अर्थ लागूच शकत नाही. आपल्या जीवनाचा नियंता मन आहे.
कर्मबंधाला मनच कारणीभूत आहे. मोक्ष आणि बंधन यामध्ये मनाचाच प्रभाव महत्त्वाचा आहे. हे मनाचे महत्त्व आपण लक्षात ठेवून त्याला नियंत्रित करूनच आपण जीवनात योग्य दिशेने जाऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे, असे पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी सांगितले.
