राजेंद्र बाठिया यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिक, औरंगाबाद, जळगांव, नागपूर, चंद्रपूर, धुळे, अकोला, अमरावती, अहमदनगर, गोंदिया व पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणच्या संघटनांनी दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजीच्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या बंद ला महाराष्ट्रातील व्यवसायीकांचा वाढता पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा बंद ठेवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.
२४ ऑगस्ट २०२४ रोजी वाशी मुंबई येथे दि ग्रेन, राईस अॅन्ड ऑईल सीडस् मर्चेंटस् असोसिएशन (ग्रोमा) च्या माध्यमातून ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंबई व शेजारच्या सर्व जिल्ह्यांतील संघटनांचा व्यापारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात व्यापारी संघटना व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राजेंद्र बाठिया यांनी दिली. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्या तर्फे रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४ रोजी दि पूना मर्चेंटस् चेंबर, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले होते.
सदर परिषदेत महाराष्ट्राच्या सर्व ६ महसूल विभागातून राज्यस्तीय व्यापारी मेळावे कृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्याचे ठरले होते. त्यानुसार सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली व भूसार आडत व्यापारी महासंघ, सोलापूर येथे राज्यस्तीय व्यापारी मेळावे आयोजित करण्यात आले होते. तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने त्यांच्याकडे मिटिंग घेऊन बंदमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.