देवेंद्र फडणवीस : बाजार समिती, जी.एस.टी. विषयांवर समिती गठीत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे ललीत गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदच्या व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली (मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात) उच्चस्तरीय बैठक झाली.
या बैठकीमध्ये कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार माधुरी मिसाळ, पणन, वित्त, सहकार व नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी प्रास्ताविक केले.
कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया व दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समितीच्या विविध प्रश्नांची मांडणी केली. फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जी.एस.टी.चे प्रश्न मांडले. तसेच मोहन गुरनानी, दिपेन अगरवाल व भिमजी भानुशाली यांनी चर्चेत भाग घेतला.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्न समजून घेतले व बाजार समितीच्या तसेच जी.एस.टी. व अन्य विषयांसाठी कृती समिती सदस्य, मुख्य सचिव व अन्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली.
सदर समितीने ३० दिवसांच्या आत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ललीत गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले.
तसेच माधुरी मिसाळ यांनी या बैठकीसाठी विशेष प्रयत्न केले. याबाबत कृती समितीने चर्चा करून २७ तारखेचा एक दिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर बैठकीमध्ये दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले व अनिल भन्साळी उपस्थित होते.