माधुरी मिसाळ : वर्धमान सांस्कृतिक केंद्रात एक्झिबिशनचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर, 1949 साली शांताबाई रायसोनी, सुलभा चोरडिया, कुंदनबाई बाफना यांनी महिला सशक्तीकरणासाठी कस्तुरबा महिला ग्रुपची स्थापना केली.
हा ग्रुप आजही महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. प्रमिलाबाई सांकला अध्यक्ष असलेल्या कस्तुरबा महिला ग्रुपच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक केंद्रात एक दिवसीय एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
याचे उद्घाटन पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले, मनीषा चोरबेले, कल्याणी दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या एक्झिबिशनमध्ये महिलांना 90 स्टॉल देण्यात आले आहेत, ज्यातून त्यांना आर्थिक सक्षमीकरण तसेच महिला एकत्रीकरणाचा लाभ होणार आहे.
सुमारे 350 हून अधिक सदस्य असलेल्या कस्तुरबा महिला मंडळाच्या वतीने वर्षभरात 10 वेगवेगळे कार्यक्रम दोन ग्रुपमध्ये केले जातात. त्यात पिकनिक, मोटिवेशनल स्पीकर, दानकार्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो, ज्यामुळे महिलांना घराबाहेर पडण्याची संधी मिळते.
अध्यक्ष प्रमिलाबाई सांकला आणि आशा बलदोटा यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रतिभा लोढा, मधु बाफना, लतिका सांकला, रेखा बाफना, संदीपा बाफना, दीपा कर्नावट, सरिता बलदोटा या महिलांच्या नेतृत्वात हा ग्रुप प्रभावीपणे चालवला जात आहे.
