वर्दळीच्या रस्त्यांचे तातडीने काम करण्याचे महानगर आयुक्तांचे निर्देश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर राबविण्यात येणाऱ्या सवलतदारांना नोटीस बजावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यासह इतर महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, वाहनचालकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने यात सवलतदार पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडकडे संबंधित भागातील रस्त्यांची ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर करारानुसार जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मात्र, काही दिवसांपासून गणेशखिंड, पाषाण, बाणेरसह कृषी महाविद्यालयाच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संबंधित रस्ते कायम वर्दळीचे असल्यामुळे या रस्त्यांवरून शेकडो दुचाकी वाहनांची वर्दळ असते. खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांना अतिशय हळुवारपणे खड्डे चुकवत त्यातून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यांची संबंधित यंत्रणेकडून करारानुसार अपेक्षित पद्धतीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
मात्र, वारंवार सांगूनही पीआयटीसीएमआरएल याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांच्या अडचणी लक्षात घेऊन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड यांना शुक्रवारी नोटीस बजावली.
यात खराब रस्त्यांची तातडीने २५ सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या भागातील रस्त्यांसंदर्भात देखील १५ दिवसांपूर्वी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती.
