प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच, टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन झाले.
भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढत आहेत.
यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून यासाठी मेट्रोसारखे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढवणे ही काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप आणि इतर मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.
पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोच्या कामाला गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोच्या कामाला २०१४ पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो कंपनी स्थापन करून हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो.
पुणे ही समाजसुधारकांची भूमी आहे आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देणारे स्मारक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

