तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : सकल मराठा समाज, भूम तालुक्यातील सक्रिय आंदोलकांनी संतोष पंडीतराव देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी तपास जलद गतीने पूर्ण करण्याचे व संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केले आहे.
संतोष पंडीतराव देशमुख (रा. मस्साजोग, ता. केज, जि. बीड) यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागरीकांमध्ये तीव्र संताप असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास समाजामध्ये अस्वस्थता वाढत आहे.
संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते, व त्यांची हत्या गंभीर स्वरूपाची असल्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलने देखील सुरू आहेत.
सकल मराठा समाजाने निवेदनाद्वारे सरकारला स्पष्ट चेतावणी दिली आहे की, जर आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. यासाठी होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
