प्रमिला नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. जितोच्या माध्यमातून जैन बंधू हे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत. दातृत्व, तपस्या आणि सेवा या क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य आहे, असे गौरवोद्गार स्वामी गोविंद देव गिरी यांनी काढले.
जितो पुणेचा 18वा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी(दि.02मार्च) बिबवेवाडीतील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारांचे वितरण स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.
पूनावाला फिनकॉर्पचे कार्यकारी संचालक अभय भुतडा, पिनन्स कमर्शिअल्सचे संचालक सौरभ बोरा, जितो पुणे विभागाचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, दिनेश ओसवाल, किशोर ओसवाल, संजय डागा, दिलीप जैन, वर्धापन दिन सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. विशाल शिंगवी, जितो अॅपेक्सचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, श्रमण आरोग्यमचे उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो ॲडव्हायझरीचे ॲड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, प्रकाश धारीवाल, रवींद्र सांकला, जेएटीएफ राष्ट्रीय उपाध्यक्ष इंदर जैन, अॅपेक्सचे संचालक अचल जैन, धीरज छाजेड, जितो महिला विभाग अध्यक्ष संगीता ललवाणी, जितो क्रीडा विभागाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, अजय मेहता, जितो ROM झोनचे अध्यक्ष अजित सेठिया, इंदरकुमार छाजेड, मनोज छाजेड, विनोद मांडोत, सुदर्शन बाफना, अशोक हिंगड यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामी गोविंददेव गिरी पुढे म्हणाले, मातेची पूजा करणे हे आपल्या परंपरेत महत्त्वाचे आहे. आदिशंकराचार्य हे देखील मातेचे महात्म्य जाणून होते. मातेने दिलेले संस्कार ही एक शक्ती आहे. तिचा यथोचित सन्मान करणे धर्मशास्त्रातही सांगितले आहे.
सध्याचा काळ हा भारताचा अमृतकाळ आहे. कायदे करून दबलेल्या समाजाचे, धर्माचे उत्थान होण्याची गरज भासते तेव्हा श्रेष्ठ संघटन होणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे सद्गुणांची पारख होऊन त्यांची पूजा होणेही आवश्यक असते. आपल्या समाजाच्या कल्याणासह आपल्या देशाचे कल्याण व्हावे याकरिता रात्रंदिवस देशाचा विचार करावा आणि देशात अनुकुलता टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत.
संघटित होऊन कार्य केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रत्येकाने आपला समाज जिवंत ठेवण्यासाठी समाजाच्या घटत्या लोकसंख्येवर विचार करणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीचे आचारण कसे असावे याकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
चांगल्या सात्विक समाजाचे घटते प्रमाण आणि त्या विरुद्ध दहशतवादी, वाईट वृत्ती, हिंसा यांना प्रोत्साहन देणाऱ्या वाढत्या समाजाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. राजेश सांकला यांनी प्रास्ताविक केले. समाजातील हिरे शोधून त्यांचा गौरव करण्याचे काम जितो करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला समाजातील अनेक संस्थेचे पदाधिकारी, जितोचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमिला नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्काराने, औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजय उदयबाबू शहा, सामाजिक सेवेसाठी विनोद शंकरलाल राठोड, व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजित सोहनलाल जैन, युवा उद्योजक सुधेंदू चैतन्य शहा, डॉ. पूजा अभिजित लोढा तसेच संस्थात्मक कार्यासाठी आणि माहिती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रुतभवन श्रुतदीप रिसर्च फौंडेशन यांचा गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
