आनंद दरबार येथे गुरू आनंद मेडिकल सेंटरचे उद्घाटन
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : अहमदनगर येथील चिंचोडी येथे आंतरराष्ट्रीय केंद्र बनत आहे. येथून धार्मिक गृहस्थ प्रचारक आणि संत तयार होतील. यातून फक्त जैन धर्म नव्हे तर इतर विविध धर्मांचे संत प्रचारक तयार होतील.त्यांच्याद्वारे जागतिक मानवतेची मूल्ये रुजविण्याचे काम सुरू होईल. असे प्रतिपादन प.पू.प्रविणऋषीजी म.सा.यांनी आनंद दरबार येथे केले.
दत्तनगर आनंद दरबार येथील माफक दरातील गुरू आनंद मेडिकल सेंटरचे उद्घाटन उपाध्याय प.पू.प्रविणऋषीजी म.सा. यांच्या चरणस्पर्शाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
याप्रसंगी उपाध्याय प.पू.प्रविणऋषिजी म.सा., प.पू.तीर्थेशऋषिजी म.सा. प.पू.चंदनबालाजी म.सा., प.पू.पद्मावतीजी म.सा. आदी संतांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. म्हणाले की, तरुणांमध्ये धर्माला घेवून आपुलकीचा भाव आहे. परंतु तरुणांना धर्मातील असणारे कर्मकांड, पाखंड आणि अवडंबर आवडत नाही. आताचे युवक हे रिझल्ट ओरिएंटल आहेत.
युवकांना आपण दाबू शकत नाही आणि आपल्या मनासारखं वागवू शकत नाही. कोणताही धर्म भेदभाव करत नाही. जैन धर्म हा लोक धर्म आहे. महावीर गाथेतून सर्वसामान्य माणूस महावीर कसा बनतो याचे विवेचन आहे.
महावीर बनण्याची यात्रा यात सांगितली जाते. गेली तीस वर्षे अविरतपणे आम्ही महावीर गाथेचे पारायण करतो आहोत. गुरुदेवांची भावना होती की घरातच विचाराचे मंदिर असावे. ते आता साकार होताना दिसते आहे. पारलौकिक मूल्ये जगण्यापेक्षा इहलौकिक मूल्यात आपण माणूस म्हणून कसे जगू हे बघणे गरजेचे आहे.
स्वतःच्या जीवनात शांती समाधी आणि समृद्धी पाहिजे असेल तर आपण इतरांच्या आयुष्यात शांती समाधी आणि समृद्धी दिली पाहिजे. असेही ते म्हणाले. चौदा एप्रिल ते एकवीस एप्रिल दरम्यान पुण्यात महावीर गाथेचे आयोजन जैन सकल संघाच्यावतीने आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आनंद दरबाराचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.
यावेळी प्रफुल्ल कोठारी, डॉ.अमित शहा यांचा सन्मान करण्यात आला. आनंदरत्न जैन स्थानक, आनंद दर्शन महिला मंडळ, आनंद दरबार बहुमंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य भंडारी आणि सौरभ धोका यांनी केले.
