महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : माणूस म्हणून घडत असताना संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. संस्कारांनी मनुष्य समृद्ध होतो. त्याला जगण्याची दिशा मिळते. संस्कारांचं हे विद्यापीठ आपल्या आई-वडिलांच्या रुपाने प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यामुळे आई वडील हेच आपले दैवत आहेत असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराच्या समारोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, विश्वस्त रमेश अवस्थे, मधुकर टिळेकर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर फेंगसे, सहसचिव प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सीईओ डॉ. गजानन आहेर, मुख्याध्यापिका ललिता काकडे, मुख्याध्यापक मोहन लोणकर, मुख्याध्यापिका शुभांगी बरेल्लू, जयश्री माकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अरुण अडसूळ म्हणाले की, खडकी शिक्षण संस्था ही नेहमीच समाजपयोगी कामे करीत असते. या उन्हाळी शिबिराचे आयोजन हा त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुलांचा व्यक्तिमत्व विकास होण्याचं हे सर्वात सुंदर माध्यम आहे.
विचारपिठावर मुलांनी व्यक्त होणे, स्वतःच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देणे यामुळे विद्यार्थी हा स्वतःला जगाच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करत असतो. कार्यक्रमाच्या वेळी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी संपूर्ण शिबिराचा गोषवारा मान्यवरांपुढे आणि उपस्थित पालकांपुढे मांडला.
अशा विविध शिबिरांचे आयोजन पुढील काळात खडकी शिक्षण संस्था करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिबिराच्या समारोप समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही उपस्थित होते. यावेळी मातृ-पितृ पूजन करून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांप्रती आपला स्नेह वृद्धिंगत केला.
यावेळी शिबिरार्थींनी आपली मनोगते व्यक्त केली.शिबिरात शिकविलेले पथनाट्य ही प्रमुख पाहुण्यांसमोर विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव आनंद छाजेड यांनी मानले तर सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.
