महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे उपविभागीय कृषी अधिकारी,भूम शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्व गावबैठक आयोजित करण्यात आली होती.
या गाव बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आणि तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे उपस्थित होते. कृषी सहाय्यक पी. एस. मुंडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन घरगुती बियाणे उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.
उगवण क्षमता तपासताना सुतळीगोणपाटामध्ये घरगुती सोयाबीनच्या १०० बिया १० ओळी मध्ये १० अशा ठेवाव्यात. चार-पाच दिवस हलके पाणी दिल्यानंतर बियांची उगवण होते. बियांची उगवण क्षमता ७०% किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ते बियाणे पेरण्यास वापरावे आणि उगवण शक्ती ६०% असल्यास १० % अधिकचे बियाणे वापरावे.
६०% पेक्षा कमी उगवण क्षमतेचे बियाणे पेरणीस वापरू नये अशी माहिती दिली. सोयाबीन बीजप्रक्रिया करताना आधी रासायनिक बीजप्रक्रिया करावी व त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. रासायनिक बीजप्रक्रियेत एजोक्सीस्ट्रोबिन २.५% + थाओफनेट मिथाईल ११.२५% + थायोमेथोक्साम २५% असे घटक असणारे बीजप्रक्रिया औषध ५ मिली प्रति किलो बियाणे वापरावे.
व त्यानंतर तीन तासांनी रायझोबियमने जैविक बीजप्रक्रिया करावी. जेणेकरून विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पन्न वाढेल. तदनंतर तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांनी शंखी गोगलगाय नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले. गोगलगाय नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगाय उन्हामुळे नष्ट होतील.
तसेच शेताच्या भोवती ५ सेंटीमीटर रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा. तसेच रात्री गुळाच्या पाण्यामध्ये गोणपाट भिजवून शेतामध्ये विविध ठिकाणी ठेवावेत जेणेकरून रात्री गोगलगाय त्यामध्ये येऊन बसेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गोळा करून त्यावर मीठ किंवा साबणाचे पाणी टाकावे जेणेकरून त्या नष्ट होतील.
तसेच मेटालडिहाइड २.५% रासायनिक औषध प्रादुर्भाव झाल्यानंतर वापरन्याचे सुचविले. गोगलगाय गोळा करताना हातामध्ये मोजे घालण्याचे महत्त्व सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सोयाबीनच्या विविध वाण, आंतरपीक पद्धती, विविध ट्रॅप याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ आणि टोकन पेरणीचे महत्त्व समजावून सांगितले.
या गावबैठकीस माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताप्पा तळेकर सरपंच संदीप मगर, अमेय बाळासाहेब पाटील, ग्रामसेवक निलम जानराव, रविंद्र लोमटे आश्रुबा कदम, शांतलिंग घोंगडे, सुनील तळेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
