जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे : ४५ दिवस डाटा सुरक्षित, मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, २१ होणार फेऱ्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनःमोजणी करण्यात येते; मात्र आक्षेप न आल्यास इव्हीएममधील सर्व डेटा नष्ट करण्यात येईल. ४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता इव्हीएममधील मतांची मोजणी करण्यास सुरुवात होईल.
पहिल्या फेरीला साधारण अर्ध्या तासाचा वेळ लागणार असून, चारही जिल्ह्यांतील मतदारसंघांचा विचार करता दुपारी अडीचपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल,” अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते”मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या ‘१७ सी’ या अर्जात एकूण मतदानाची आकडेवारी देण्यात आली आहे.
मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्षमोजलेली मते या ‘१७ सी’ मधील आकडेवारीशी जुळवली जाते. त्यात तफावत आढळल्यास संबंधित मतदान केंद्राध्यक्षाकडील डायरीतील आकडेवारीशी पुन्हा जुळवणी केली जाते.
ती न जुळल्यास व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांची पुन्हा एकदा जुळवणी केली जाते. मतमोजणीनंतर पाच व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांचीही मोजणी केली जाते. उमेदवारांना यासंदर्भात शंका असल्यास निरीक्षकांसमोर पुन्हा मतमोजणी केली जाते.
त्यानंतर हे सर्व इव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट सीलबंद करून गोदामांमध्ये साठविले जाते.” मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात येणार आहे.
त्यानंतर साडेआठ वाजता इव्हीएममधील मतांची मोजणी करण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीला साधारणअर्ध्या तासाचा वेळ लागणार असून, चारही जिल्ह्यांतील मतदारसंघांचा विचार करता दुपारी अडीचपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, अशी आशा आहे.
टपाली मतमोजणी साधारण साडेबारा वाजेपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे; मात्र नियमानुसार या मतांची मोजणी शेवटच्या फेरीपूर्वी होणे अपेक्षित आहे. शेवटच्या फेरीतील मतांमध्ये ही मते मिळवली जातात, त्यानंतर अंतिम मते घोषित करण्यात येतात.
टपाली मतमोजणीसाठी १७४ अधिकारी व कर्मचारी तर इव्हीएम मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याचे दिवसे यांनी यावेळी सांगितले. मतमोजणीच्या२१ होणार फेऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी २०१८ मतदान केंद्र होते.
त्यानुसार सहा विधानसभा मतदारसंघांसाठी १०२ टेबल लावण्यात आले आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या २१ फेऱ्या होणार आहेत, बारामतीसाठी २५१६ मतदान केंद्र होते. त्यामुळे ११४ टेबलांची आवश्यकता आहे. या मतदारसंघात २४ फेऱ्या होणार आहेत. शिरूरमधील २५०९ मतदान केंद्रांसाठी १०० टेबल लावले आहेत. टेबलांची संख्या कमी असल्याने मतमोजणीच्या २८ फेऱ्या होणार आहेत.
