काव्यसंग्रह व लेखसंग्रह दोन्हींचा झाला सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे या संस्थेच्या वतीने हॉटेल अयोध्या, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तितिक्षा कला साहित्य संमेलनामध्ये येथील कवी रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘माणुसकीचं आभाळ’ या काव्यसंग्रहासाठी व ‘अक्षरांची रांग’ या ललित लेख संग्रहासाठी तितिक्षा राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोल्युशन माईंड चे संस्थापक व संमेलनाचे उदघाटक सुजित दातार यांच्या हस्ते तर चित्रपट दिग्दर्शक सतीश रणदिवे, नाट्य दिग्दर्शक संजय हळदीकर, सतीश इंदापुरकर, पटकथा लेखक युवराज पाटील, लेखक हिमांशू स्मार्त, अभिनेत्री छाया सांगावकर, शर्वरी जोग, ज्येष्ठ रंगकर्मी पितांबर काळे, तितिक्षा च्या संस्थापिका प्रिया प्रमोद दामले आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी या संमेलनासाठी राज्यभरातून अनेक साहित्यिक उपस्थित होते. रामचंद्र इकारे यांच्या पुस्तकांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया दामले यांनी तर सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले.
