पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे आदेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बकरी ईद सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल / कुर्बानी करण्यात येते. (१७ जून) राज्यात कोठेही गोवंशाची कत्तल होणार नाही तसेच उपरोक्त अधिनियमांचे उल्लंघन होणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात दिनांक- ४ मार्च २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी (सुधारित) रक्षण अधिनियम १९९५ लागू करण्यात आला आहे.
सदर सुधारित अधिनियमाप्रमाणे गोवंशाची कत्तल करण्यास मनाई आहे तसेच या अधिनियमातील नियम ५ अन्वये गोवंशाची कत्तल, कत्तलीसाठी वाहतुक, कत्तलीसाठी निर्यात, कत्तलीसाठी खरेदी-विक्रि, कत्तली करिता विल्हेवाट, गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास व महाराष्ट्राबाहेर कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई आहे.
१७ जून रोजी बकरी ईद आहे. राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षक यांनी बकरी ईद सणाच्या दिवशी राज्यात कोठेही गोवंशाची कत्तल होणार नाही तसेच उपरोक्त अधिनियमांचे उल्लंघन होणार नाही, यांची काळजी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
