वर्धमान प्रतिष्ठान येथे चातुर्मासानिमित्त प्रवचन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कोणतीही घटना किंवा प्रसंग लगेच मनातून काढून टाकणारा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणाराच खरा साधू असतो असे विचार साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनात व्यक्त केले.
चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत साध्वी शिलापीजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. वर्धमान प्रतिष्ठान येथे त्यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
प्रवचनात त्या म्हणाल्या, जैन धर्म हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भोवतालच्या कुठल्याही जीवाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता केवळ याच धर्मात घेतली जाते. अगदी लहानशा मुंगीलाही त्रास होऊ नये हे या धर्मातील तत्त्वज्ञान आहे. जेव्हा आपण स्वतःच्या दुःखाबरोबरच दुसऱ्याचेही दुःख अनुभवण्याची क्षमता ठेवतो त्याला केवल ज्ञान म्हटले जाते.
परंतु आपण फक्त स्वतःच्याच दुःखाचे अनुभव घेतो. आपल्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीवही होत नाही. सर्व द्रव्यांच्या सर्व पर्यायांना जो जाणतो त्याला केवल द्रव्य म्हणतात. यात सर्व काही अनुभवातून शिकले जाते.
असे अनेक संत आहेत ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून अनेक अनुभव घेतले आहेत. यामध्ये आपण संत कबीर, संत तुलसीदास, संत तुकाराम यांचा उदाहरण घेऊ शकतो.
भगवान महावीर यांनी नेहमी समूहाचे समर्थन केले आणि म्हणूनच त्यांनी संघाची स्थापना केली.
जेव्हा तीर्थंकर समूहात येतात तेव्हा सर्वप्रथम संघाला शरण जातात. असे विचार त्यांनी मांडले. क्रोध हा वाईट आहे हा आपला विचार असला तरी जेव्हा क्रोधाची भावना मनात येते तेव्हा विचार कुठेतरी दूर सोडला जातो आणि म्हणूनच विचारापेक्षा भाव हा जास्त प्रभावशाली मग तो क्रोध भावही असू शकतो आणि प्रेमभावही असू शकतो, परंतु क्रोध भावना मनात आल्यावरही जो क्रोधी होत नसेल तो साधू असतो. आपल्या अहंकाराला घात झाल्यानंतरही जो स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने साधक असतो.
कुठल्याही अडचणीतून लवकरात लवकर बाहेर येण्याची क्षमता ही साधनेमध्ये असते आणि म्हणूनच साधना करणे मानवी जीवनासाठी अत्यंत गरजेचे असते. एखादी घटना झाल्यानंतर जो तिला लगेच विसरण्याची क्षमता ठेवतो तो साधक असतो. असे उद्बोधन त्यांनी केले.त्या पुढे म्हणाल्या, आपल्या मनात अनेक प्रकारच्या भावना असतात.
परंतु आनंदी भावाला स्पर्श करणे साधनेतून शक्य होते. ज्याप्रमाणे मनाला सुदृढ करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे भावाला सुदृढ करणे देखील गरजेचे असते. एका तासातील प्रवचनात आपण जेही काही ऐकलो, दिवसातील येणाऱ्या 23 तासात त्याचा विचार करून त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे देखील साधनाच असते.
