वर्धमान प्रतिष्ठान येथील प्रवचनात प्रतिपादन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जैन धर्म दिगंबर श्वेतांबर पंथ यात विभागलेला असला तरी जैन धर्म हा एकच आहे, हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आचार्य चंदनाजी यांनी चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे आयोजित प्रवचनात केले.
प्रवचन देत असताना त्या म्हणाल्या, दिगंबर आणि श्वेतांबर यांचे आचरण वेगळे असू शकते पण त्यांचे सिद्धांत आणि त्यांचे विचार मात्र एकच आहेत. त्यात कोणतेही प्रकारचे अंतर नाही कारण त्यामागे शास्त्र एकच आहे आणि म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जैन हा एकच धर्म आहे. जीवनाच्या धारांविषयी काही गोष्टी त्यांनी सांगितल्या.
जीवनाच्या दोन धारा असतात, एक म्हणजे बहिर्गत आणि दुसरी अंतर्गत. बहिर्गत जीवन जगत असताना अंतर्गत जीवनाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. अंतर्गत जीवन म्हणजे मन, भावना, जीव म्हणून आपण त्याला ओळखतो. तीच जीवनाची अंतर्गत धारा असते.
ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश जमिनीवर येण्यासाठी ढगांचे अडथळे दूर होऊ द्यावे लागतात, ढगांचे अडथळे दूर झाल्यावर सूर्यप्रकाश अगदी प्रखरपणे जमिनीवर येतो त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रश्नांचे आवरण कमी केल्यावर आपल्याला दूरदृष्टी आणि निर्णय क्षमता प्रखरपणे प्राप्त होऊ शकते. असे प्रतिपादन त्यांनी केले.
साध्वी शिलापीजी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. जेव्हा आपण प्रवचनात येतो, गुरु समोर बसतो, गुरुच्या दिव्याच्या ज्योतीतून आपण प्रकाशित होत असतो त्यांच्या चमत्कारिक स्पर्शामुळे आपल्याला दिव्यतेची अनुभूती होत असते आणि मग त्यामुळे आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते.
आपला मार्ग कोणताही असो मग तो सेवेचा असो, ध्यान धारणेचा असो किंवा तपश्चर्येचा असो. त्या मार्गावरून चालताना नेहमीच आदर, प्रेम आणि सन्मानाने चालले पाहिजे. प्रत्येक लहान लहान काम ताईमांनी अत्यंत आदरपूर्वक आणि सन्मानाने केले आहे. आपण छोट्या गोष्टींही प्रेमाने आणि आदरपूर्वक भावनेने केल्या तर ते कर्म सुद्धा महान होऊन जाते. असे विचार साध्वी शिलापीजी यांनी मांडले.
