वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जीवन जगत असताना प्रत्येक कर्म प्रेमाने करावे. सुंदर आयुष्य जगत असताना नेहमी आनंदी राहावे आणि आपल्या आयुष्याचा कधीही अनादर करू नये असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले.
चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत आचार्य चंदनाजी आणि साध्वी शिलापीजी यांनी आपले विचार मांडले. आचार्य चंदनाजी म्हणाल्या की, आपल्याला आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपण माणूस म्हणून जन्माला आलो.
इतर जीवांपेक्षा आपल्याला चांगले कर्म करण्याची संधी देवाने दिलेली आहे. आपल्याला भावना दिलेल्या आहेत आणि व्यक्त होण्यासाठी खूप मोठी संधी सुद्धा दिलेली आहे. म्हणूनच आपल्या आयुष्याचा कधीही अनादर करू नका. आयुष्यातील प्रत्येक कर्म हे प्रेमाने करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा.
आचार्य चंदनाजी पुढे म्हणाल्या की, आपल्या आयुष्यातील प्रसन्नतेला जर कोणी इजा करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा कारण तुम्ही जितके प्रसन्न राहता तितके तुमचे स्वास्थ आरोग्य चांगले राहील म्हणून तुम्ही जेही काही व्रत कराल ते नेहमी प्रसन्नतेने करा असे म्हणून भगवान महावीरांच्या आयुष्यातील काही प्रसंग देखील त्यांनी सांगितले.
त्यानंतर साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. आपल्या प्रवचनातून निसर्गाविषयी सांगत असताना त्या म्हणाल्या की, आपण स्वतःला वाचवण्यासाठी निसर्गाला वाचवत असतो पण भगवान महावीर म्हणतात की जसे आपण जगू इच्छितो तसे निसर्ग देखील जगू इच्छितो.
भगवान महावीरांचे हे उच्च विचार आपण समजून घेणे आवश्यक आहे. निसर्गाच्या सुरक्षेसोबतच त्याचे संवर्धन देखील करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की विरायतन केंद्रात ताईमांनी निसर्गासाठी लाखो वृक्ष लावले. ज्या प्रकृतीचा आपण उपयोग करत असतो त्या प्रकृतीचे संवर्धन करणे ही देखील एक मनुष्य म्हणून आपली जबाबदारी आहे.
