मुसळधार पावसातही प्रवचनातून अमृतधारांचा वर्षाव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भगवान महावीर यांची अहिंसा समजून घ्यायला हवी. ती सूक्ष्म अहिंसा आहे. महात्मा गांधीजींनीसुद्धा अहिंसेचा स्वीकार केलेला होता. ते सत्याग्रह म्हणत असत. परंतु महावीरांच्या अहिंसेत कशाचाच आग्रह नाही. कारण आग्रह आहे तिथे हिंसा आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवर त्यांनी अहिंसेचा विचार केलेला होता, असे प्रतिपादन साध्वी शिलापीजी यांनी आज केले.
पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना देखील चातुर्मासानिमित्ताने वर्धमान प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये खंड पडला नाही. भाविक मोठ्या संख्येने आजही उपस्थित होते. साध्वी शिलापीजी यांनी उपस्थितांवर अमृतधारांचा वर्षाव केला.
साध्वी शिलापीजी यांनी प्रार्थनेचा अर्थ समजावून सांगितला. त्या म्हणाल्या, आपल्याला प्रत्येक नातेसंबंधांमध्ये अपेक्षा असते. आपणच आपल्या मनाला जाणत नाही. पाण्याचा बुडबुडा जसा असतो त्याला स्पर्श होताच तो फुटतो त्याहीपेक्षा नाजूक म्हणजे आपले मन असते.
त्यामुळे आपल्या सगळ्या नातेसंबंधांमध्ये काही ना काही अपेक्षा असतातच. परंतु ईश्वर मात्र निरपेक्ष असतो. त्याची तुमच्याकडून कुठलीच, कसलीही अपेक्षा नसते. आपण ईश्वराचे स्मरण करो अथवा न करो त्याची कधीच आपल्याविषयी तक्रार नसते. अपेक्षा नसते.
आपण जेव्हा स्मरण करू त्या क्षणी ईश्वर आपल्या समीप असतो. आपण विसरतो पण ईश्वर आपल्याला कधीही विसरत नाही. म्हणून ही निरपेक्षता समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरावर आपले कोणतेही नियंत्रण नाही हे आपण प्रथमतः समजून घेतले पाहिजे.
आपल्याला जे काही करावेसे वाटते ते करण्यासाठीचे माध्यम म्हणजे शरीर आहे. परंतु या शरीरासमवेत कधी काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही त्यामुळे आपण शरीरावर विसंबून राहू नये. शरीर साथ देत आहे तोवर आपण चांगली कामे, पुण्यकर्म करून घ्यावीत.
आज आपल्या जीवनात खूप व्यस्तता आहे परंतु शांतता नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण सत्कर्मावर भर दिला पाहिजे. जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत आपण हसत खेळत जगले पाहिजे. सत्य, अहिंसा यांचे अमृत आपण घेतले पाहिजे आणि हे सारे करताना आपली वाणी सुंदर असावी आणि त्यातून आपले जीवन देखील सुंदर बनावे असा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन साध्वी शिलापीजी यांनी केले.
