वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : तपाचे सामर्थ्य मोठे आहे परंतु ज्ञानाविना नुसते तप उपयोगी नाही. ज्ञानाची अनंत क्षमता आपल्यात दडलेली आहे ती पूर्णत्वाने बाहेर येणे गरजेची आहे, असे प्रतिपादन साध्वी श्री शिलापीजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानतर्फे चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. पुण्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली असतानाही भाविक मोठ्या संख्येने प्रवचनातील बोधामृत ऐकण्यासाठी उपस्थित होते. मनुष्याच्या ८ कर्मांची माहिती त्यांनी दिली आणि त्याविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले.
साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, मी लहान असताना रामकृष्ण मठात तेथील विद्वानांचे भाषण ऐकायला जात असे. आपल्याकडेही असे का होत नाही असा मला प्रश्न पडायचा. आपल्या ज्ञानाची परंपरा हळूहळू कमी होत चालली आहे. आपल्याला ८ कर्म कोणती हे सुद्धा पटकन सांगता येत नाही.
जीवन सुंदर बनवण्याचे जे मार्ग भगवान महावीर यांनी सांगितले आहेत तेही आपल्याला माहित नाही. इतके मोठे ज्ञानाचे भांडार आपल्याकडे आहे. पण ते धूळ खात पडले आहे अशी स्थिती आज आहे. दक्षिणेकडे एक काळ असा होता जेव्हा असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर जैन आचार्यांनी भाष्य केलेले नव्हते.
परंतु हळूहळू आपली ज्ञानाची आस कमी होत गेली आणि आपण तपश्चर्येवर लक्ष केंद्रित केले. आपली आत्मा एखाद्या आरशासारखी आहे. त्यावर धूळ साठली तर आपले प्रतिबिंब दिसेल का? म्हणूनच भगवान आपल्या मनातील कलुषितपणा दूर करतात आणि आपल्या त्यावरची धूळ काढून टाकतात.
आत्म्यामध्ये जाणून घेण्याची अनंत क्षमता आहे. परंतु त्यावर ढगांचे आवरण आहे. स्वाध्याय, तपश्चर्या, साधना केल्याने अंतरात्मा स्वच्छ होतो. म्हणून चातुर्मास काळात आपण ज्ञान संपादन करायचा प्रयत्न करतो. आपण आगीत हात टाकायला जात नाही कारण आपला हात त्यात जळेल हे आपण जाणून असतो.
ज्याचा आपल्या कर्मावर, पुनर्जन्मावर आणि ज्ञानावर विश्वास असतो तो सत्कर्मावर भर देतो. हे सगळे समजत असूनसुद्धा आपल्या हातून चुकीच्या गोष्टी का घडतात कारण आपली श्रद्धा कमी पडते.
\साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, महावीरांचे संपूर्ण जीवन एका शब्दात सांगायचे तर ते म्हणजे सजगता. अवेअरनेस या एका शब्दात सांगता येईल. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात अशाच अवेरनेसमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जेव्हा आपण ज्ञानाशिवाय तप करतो तेव्हा आपल्याला देवगती मिळते पण आपले लक्ष्य मोक्ष हेच आहे. अनेकदा आपल्याकडे काही जण म्हणतात देवाने शिक्षा दिली म्हणून असे झाले. देव आपल्याला शिक्षा का देईल, काही जण त्याचा संबंध नशिबाशी जोडतात. पण जैन धर्म हे कर्मामुळे घडते असे मानतो आणि तेच अधिक योग्य वाटते.
जे शुभ आहे ते पुण्य आहे आणि जे अशुभ आहे ते पाप आहे त्यामुळे दिवसभरात आपण काय पुण्य कर्म करतो आणि काय अशुभ कर्म करतो हे प्रत्येकाने पाहायला हवे. साध्वी रोहीणीजी यांनी स्तवन सादर केले.
