वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेत मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : मी आत्मा आहे, माझे शरीर म्हणजे मी नाही, ही जाणीव आपल्यात निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या आत्म्याचे स्वरुप हे पाण्यासारखे निर्मळ आणि विशुद्ध आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेत प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी आज बहुमोल असे मार्गदर्शन केले. श्रद्धेने उपस्थित राहिलेल्या भाविकांना अमृतवाणीचा आनंद मिळाला. प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, पाण्याला जसा कोणताही रंग नसतो. तसेच आत्म्याचे स्वरुप विशुद्ध असते.
इतर अनेक रंगांना धुवून काढण्याचे काम पाणी करते. स्वतःचे विशुद्धपण हरवत नाही. तसेच आपल्या आत्म्यावर जे कशायरुपी आवरण चढलेले असते ते दूर होणे गरजेचे असते. अहंकार हा माझा स्वभाव नाही, क्रोध हा माझा स्वभाव नाही ही जाणीव आपल्याला होते तेव्हाच आपण आत्म्याचे खरे स्वरुप जाणू लागतो. श्रेष्ठ काम करून आत्म्याचे मित्र बनता येते.
कशायांपासून मुक्त होऊन जगणे जमू लागले की आनंदी, प्रसन्न आणि यशस्वी जीवनाच्या दिशेने जाता येते. अशाच पद्धतीने सर्वांचे जीवन मंगलमय व्हावे हीच मनोकामना आहे.
नियती सर्वकाही करीत असेल तर पुरुषार्थ कशासाठी असा प्रश्न एका भाविकाने उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जे निश्चित आहे ती नियती आहे.
एखादी गोष्ट निश्चितपणे घडणार असेल तर ती नियती असते. नियतीला अनुसरून आपला पुरुषार्थ असायला हवा. काही गोष्टी विनासायास प्राप्त होतात परंतु काही चांगल्या गोष्टी आवर्जून करीत जीवनमार्गात पुढे जायचे असते. सत्कार्य करीत पुढे जाणे हाच खरा पुरुषार्थ असतो.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, अधिकांश लोक मिथ्या जीवन जगतात. त्यांच्या जीवनात निराशा, अंधकार भरलेला असतो. ईश्वरावर विश्वास नसणाऱ्या, कोणताही विश्वास, श्रद्धा नसणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. परंतु जे आपण जगतोय त्यापेक्षा उन्नत जीवन जगता येऊ शकते ही जाणीव मनात होते तेव्हाच प्रगती सुरू होते.
आपणच घालून घेतलेली बंधने लक्षात आली की ती तोडता येऊ शकतात. अनुभवाइतकीच आयुष्यात श्रद्धाही महत्त्वाची आहे. ईश्वराच्या वाटेवर आपण चालतो आहोत ही श्रद्धा ठेवून सजगतेने चालत राहणे महत्त्वाचे असते.
ताई माँ यांनी साधू आणि साध्वी यांच्याही कार्याला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्यातील सेवाभाव जागृत केलेला आहे. अशी नि:स्वार्थ सेवा खूप मोलाची असते. आज अनेक साधू-साध्वी सेवाकार्यात चांगले योगदान देताना दिसत आहेत. आपण नि:स्वार्थ भावनेने काम करीत राहावे. ताई माँ सारख्या गुरूची आपल्यावर कृपा होते तेव्हा जीवनाला चांगली दिशा लाभते, असे प्रतिपादन प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी केले.
