वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनातून मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : अंधकार आपोआप होत जातो. परंतु प्रकाश होण्यासाठी दिवा लावावा लागतो. अंधकार दूर करण्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही. जीवनाची विषमता, विशाद, विकृती आपोआप जीवनात येतात. त्याला दूर करण्यासाठी मंत्रशक्ती आहे.
त्यासाठी पवित्र मातीने भरलेला रक्षकलश आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. तो आपल्या घरी सुखशांती नक्की आणेल. त्यातून आंतरिक शांतता प्राप्त होईल. आपल्या जीवनातही वाईट गोष्टी, त्रास देणाऱ्या गोष्टी आपोआप येतात. परंतु त्यांचा सामना आपण जीवनशक्तीनेच करायचा असतो. त्याची स्वच्छता करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि मनाची स्वच्छता जपावी लागते.
म्हणूनच अशा गोष्टींपासून आपले रक्षण करण्याचे काम रक्षाकलश करतील. भगवान महावीर यांच्या पवित्र भूमीतील माती ज्यात आहे त्यापासून बनलेला कलश आपल्याला सुख, शांती, समाधान नक्की मिळवून देईल. तो आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे, असे प्रतिपादन पदमश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पदमश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने त्यांनी संवाद साधला. या वेळी प. पु. साध्वी श्री संघमित्राजी यांनीही मार्गदर्शन केले.
पदमश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, तीर्थंकर हे आपल्या श्रद्धेचे केंद्र आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास आहे. त्यांचे जे शब्द आहेत ते आपल्यासाठी दर्शन आहेत. कुणाचीही उपेक्षा करू नका. कुणाचाही अनादर करू नका. कुणाचीही तुलना नको. कोणत्याही माणसाला इतकेच काय छोट्यात छोट्या गोष्टीची उपेक्षा कधीही करू नका.
त्यामुळे अशुद्ध आणि दूषित व्यवहार कुणाशीही करू नका. परमात्मा आत्मस्वरुप असल्याने आपले वर्तन कायम चांगले राहील असे पाहा. पदमश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, अनंत प्रवाहात आपण जेव्हा एखादा शब्द बोलतो तेव्हा त्याचे वलय बनते.
त्या वलयाच्या माध्यमातून शब्द सगळीकडे पोहोचतात. शब्दांची वलये हजारो किलोमीटर जाण्याची क्षमता असते. हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. आपण शब्दांचा प्रयोग करतो तेव्हा आंतरिक तरंगांची शक्ती खूप मोठी असते.
स्तोत्रपाठ करतो तेव्हा शब्दांचा प्रभावी वापर करायचे ठरवले तर त्या शक्तीने विशाद दूर होऊ शकतात. आत्म्याला शब्दांची विलक्षण ध्वनी ऐकता यावी अशा पद्धतीने त्याचे उच्चारण होणे महत्त्वाचे आहे. शब्दांची क्षमता अद्भुत आहे. आपण पाण्यात एखादा खडा टाकला की जसे तरंग उमटतात तसेच शब्दांची वलये निर्माण होऊन हजारो किलोमीटरचे अंतर पार करून पोहोचू शकतात. त्याहीपेक्षा अधिक क्षमता आपल्या आत्त्म्याची आहे.
