वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रगल्भ विचारांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ध्वनिमुद्रित मंत्रोच्चारांचा आधार घेऊन आधी तन्मयता प्राप्त करावी. जेव्हा हे मंत्रोच्चार तुमचे होऊन जातील तेव्हा तुमच्या आवाजात मंत्रोच्चाराचे वलय घरात जरुर निर्माण होऊ द्या. त्यातून परिवारात सुख शांती निर्माण होण्यास मदत होईल. मंत्रांचा प्रभाव आणि शक्ती खूप मोठी असते, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋषिमंडल स्तोत्राचे या वेळी पठण करण्यात आले. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, समुद्रामध्ये जसे मासे राहतात त्याभोवताली पाण्याचे वलय असते त्याचप्रमाणे आपण शब्दांच्या वलयामध्ये राहत असतो.
आपणही शब्दांच्या अनंत सागरात राहतो. आपल्यावरही शब्दांचा प्रभाव पडतो. आपण कोणत्या शब्दांचा प्रभाव पडू देतो हे आपल्यावर आहे. तीर्थंकर मुनी आपल्यासारखेच जगतात परंतु त्यांची दृष्टी ईश्वराकडे केंद्रित असते. आपला भाव आणि भक्ती तसेच महत्त्वाचे आहे ते एखाद्या नदीप्रमाणे गोड आहे. ते आपल्या जीवनात उतरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, भगवान महावीरांच्या भूमीत विरायतनचे काम सुरू केले तेव्हा त्या पवित्र भूमीचे अनेकानेक अनुभव मी घेतलेले आहेत. मी एका डोळ्यांवरील शस्त्रक्रियेसाठी कँप चे आयोजन केलेले होते. ११०० लोक त्यात सहभागी झालेले होते. रात्री मला जाणीव झाली की काहीतरी अनर्थ होणार आहे. उघड्या जागेवर ११०० रुग्ण आणि इतर १००० लोक होते.
मला जाणीव झाल्याबरोबर मी सगळ्यांना खोल्यांमध्ये जाण्याची सूचना केली. सगळे मैदानावर असणारे लोक खोल्यांमध्ये आणले. रात्री १२.३० नंतर एक प्रचंड वादळ आले आणि तुफान पाऊस सुरू झाला. त्या अघटिताची जाणीव मला अगोदरच झालेली होती ही भगवान महावीरांचीच कृपा. वेळीच सर्वांना हलवल्याने कुणालाही दुखापत झाली नाही.
हजारो लोकांचे जीव वाचले. त्यामुळे त्या पावनभूमीची माती आपल्या घरात रक्षाकलशाच्या रुपाने येणार असेल तर आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. प. पु. साध्वी श्री संघमित्राजी म्हणाल्या, मंत्रोच्चारांचे पठण करताना आपण आपल्या श्वासावरही लक्ष केंद्रित करावे.
श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा आपण सोडत आहोत आणि नवी सकारात्मक ऊर्जा ग्रहण करीत आहोत असा अनुभव घ्यावा. आपला आळस व भय, श्वास सोडताना बाहेर जात आहे असा विचार करावा. त्यातून मंत्रोच्चाराची जाणीव आणि प्रभाव आपल्याला जाणवू शकेल. आपल्याकडे अनेक शक्ती आहेत परंतु त्याची आपल्याला जाणीव नाही. रक्षाकारक मंत्रातून व्याधी दूर होतात. सुरक्षा कवच मिळते.
