भूम तालुका पत्रकार संघाची पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : बीड-येरमाळा-बार्शी मार्गे जाणाऱ्या पंढरपूर कोल्हापूर बसेस सरमकुंडी-भूम-वारदवाडी परांडा मार्गे चालू कराव्यात अशी मागणी भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
सरमकुंडी फाटा ते भूम मार्गे पंढरपूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या नसल्याने भूम व परंडा तालुक्यातील लोकांना विनाकारण बार्शी बस स्थानकात जाऊन बसावे लागत आहे. संभाजी नगर बीड आधी ठिकाणच्या गाड्या वाशी शहरात न जाता सरमकुंडी मार्गे येरमाळा बार्शी या मार्गावर धावत आहेत.
या गाड्या जर सरमकुंडी फाटा मार्गे भूम आणि परांडा स्थानकातून कुर्डूवाडी कडे रवाना झाल्या तर निश्चितपणाने भूम परांडा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंढरपूर व कोल्हापूर हे दोन्ही मोठे देवस्थान असल्याने बरेच भक्तगण या तालुक्यातून देवस्थानाला जात आहेत.
तसेच जैन धर्मियांचे तीर्थस्थान असणाऱ्या पैकी एक तीर्थस्थान कुंथलगिरी येथे असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील भाविक भक्त यांना येण्यासाठी मोठी पराकाष्टा करावी लागत आहे व काही मंडळी त्या देवस्थानातून भूम कडे येत आहेत, परंतु येताना आणि जाताना भूम मार्गे गाड्या नसल्याने संध्याकाळचा मुक्काम बार्शी या ठिकाणी तर काहीजणांना सरमकुंडी फाट्यावरती रात्र जागून काढावी लागत आहे.
या प्रकरणी पालकमंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावी. संभाजीनगर-कोल्हापूर, सांगली औरंगाबाद, बीड कोल्हापूर, माजलगाव-कोल्हापूर, संभाजीनगर-इचलकरंजी, संभाजीनगर-सांगली, संभाजीनगर-पंढरपूर,इस्लामपूर, बीड-इस्लामपूर इत्यादी गाड्या वाशी शहरात प्रवास न करता थेट येरमाळा बार्शी मार्गे प्रवास करत असल्याने संभाजीनगर बीड वरून प्रवास करणाऱ्या वाहकांना विनाकारण लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे.
तर या गाड्या भूम मार्गे परंडा करून कुर्डूवाडीकडे रवानगी झाल्यास निश्चितपणाने प्रवाशांचा पल्ला सुद्धा कमी होईल आणि भूम परंडा तालुक्यातील नागरिकांना गाड्याचा लाभ मिळेल. भूम परंडा तालुक्यातील जनतेला या मार्गे बस सेवा चालू करून दिलासा द्यावा अशी विनंती भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार गौस शेख, धनंजय शेटे, अरविंद शिंदे, अजित बागडे, अरुण देशमुख, आशिष बाबर, प्रल्हाद आढागळे, तानाजी सुपेकर, सुनीलकुमार डुंगरवाल, उदय साबळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.