वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पर्युषण पर्व हे जगाच्या शोधासाठी, जगाच्या प्रतिष्ठेसाठी, जगाच्या सन्मानासाठी, किंवा जगाच्या संपत्तीसाठी नाही, तर आपल्या आंतरिक सुख आणि आंतरिक आनंदासाठी आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.
पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, “आपल्या विचारांचे तरंग कधी गप्प बसले आहेत का? कुठे ना कुठेतरी शब्द, कुठे ना कुठेतरी विचार, कुठून ना कुठून तरी गप्पा विचारांच्या तरंगांमध्ये उठत असतात. आपल्या आत तरंगांचा खेळ चालत असतो.
अशा विचारांनी भरलेल्या तरंगांबरोबर आपण इथे का बसलोय? तर कुठेतरी शांतीचे विचार आपल्या मनाला लाभावेत म्हणून आपण इथे बसलो आहोत. आपल्या चेतनेला जागृत करण्यासाठी आपण इथे बसलो आहोत. जसे महावीर आहेत, तशी आपली चेतना आहे. महावीरांनी कधीही तुमच्यापेक्षा माझा आत्मा श्रेष्ठ आहे किंवा तुमचा आत्मा माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे असे म्हटले नाही.
त्यांनी असेच म्हटले आहे की, जसे माझे स्वरूप आहे, जसा मी आहे, तसा परमात्मा आहे.” “आपल्या जीवनात तरंगे उठतच असतात. समुद्रात जसे खाऱ्या पाण्याचे तरंग उठतात, तसेच आपल्या अंतरात्म्यात देखील खारे तरंग उठतात. ते तरंग आपल्या मनाला स्पर्श करतात, शरीराला स्पर्श करतात.
अशा प्रकारच्या तरंगांनी आपल्याला प्रवाही राहायला शिकवले पाहिजे. आपण ऐकतो कारण ज्ञानाचे एक किरण आपल्या जीवनामध्ये पडावे असे वाटत असते. आपण सगळे आंतरिक आनंदाच्या शोधात असतो. तो शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे,” असे मत पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी व्यक्त केले.
