महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि हवेली तालुक्यांतील आदिवासी समाजातील नागरिकांनी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाचा लाभ घ्यावा; आदिवासी सामाजिक संस्था, संघटना आणि आदिवासी स्वयंसेवकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आदिवासी समुदाय, आदिवासीबहुल गावे आणि आकांक्षित जिल्ह्यांतील आदिवासी कुटुंबांसाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहे.
यामध्ये आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक गाव आणि त्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पक्की घरे, पाण्याची व्यवस्था, विद्युतपुरवठा, फिरते वैद्यकीय पथक, उज्ज्वला गॅस योजना, अंगणवाडी केंद्र बांधणे, पोषण स्थितीत सुधारणा, कौशल्यविकासविषयक प्रशिक्षण, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ, मत्स्यव्यवसायास चालना, पर्यटन विकास, शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आदी लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दिली आहे.
