महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भूमकरांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. भूम शहर पूर्णपणे बंद ठेवून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी दि. २१ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी उपोषण सुरू केले आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत खालावण्याची चिन्हे दिसत असताना प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याने, धाराशिव जिल्ह्याच्या बंदच्या हाकेला साथ देत भूम मराठा समाजाच्या बांधवांनी शहर पूर्णपणे बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना, शासनाची निष्क्रीय भूमिका आणि जरांगे पाटील यांच्या तब्येतीचे होणारे नुकसान पाहून मराठा समाजात नाराजी आहे. येत्या काळात आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या घरावर मराठा समाज घेराव घालणार असल्याचे संकेतही यावेळी दिले गेले.
