महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुंबई: राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण २०६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २०५९ तक्रारींचे निवडणूक आयोगाकडून निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल ॲप कोणत्याही ॲप स्टोअरमधून डाउनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार दाखल करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते.
राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज, आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.
