महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील विधान सभा निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. कारण बंडखोराना थंड करण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे. पुण्याच्या पर्वती, शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे.
आगामी विधानसभेत पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची मनधरणी करूनही काहींनी माघार न घेता निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
पर्वती मतदार संघात महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज शेवटच्या क्षणापर्यंत बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर त्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आता पर्वतीत तिरंगी लढत होणार असून त्याचा फायदा मात्र महायुतीला होण्याची शक्यता वाढली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे सचिन तावरे यांनीसुद्धा बंडखोरी केली होती. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण ते वेळेत न पोहचल्याने अर्ज कायम राहिला आहे.
कसबा विधानसभेच्या मैदानात मनसे उतरल्याने तिरंगी लढत होणार आहे. मात्र शहराच्या प्रथम महिला महापौर असलेल्या कांग्रेस च्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी जाहीर केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम राहिली आहे. परंतु कमल व्यवहारे अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांची बंडखोरी काँग्रेसने फारशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाही. उलट मनसे मैदानात आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे.
शिवाजीनगर विधानसभेतून काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. या बंडखोरीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मनीष आनंद यांची कोणत्याही वरिष्ठ नेत्याने मनधरणी केली नाही, त्याचा किती परिणाम होईल याची काँग्रेस कार्यकर्त्यांनाच शंका असल्याने काँग्रेसही निवांत असल्याचे दिसत आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल.
