शांतीसाठी दान देण्याचा बहाणा करून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मावशीच्या आत्म्याच्या शांतीसाठी २ हजार रुपये दान करायचे आहेत. आपल्याला सुतक असल्यामुळे मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगून भामट्यांनी ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची सोनसाखळी फसवून लांबवली.
याबाबत कोंढवा येथील एका ७१ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळेकरनगर येथील आय. जी. सुपर मार्केटजवळ रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना एक जण त्यांच्या जवळ आला आणि विचारले, “येथे जवळपास हनुमान मंदिर कोठे आहे का?” त्याने सांगितले, “माझी मावशी मयत झाली आहे. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी २ हजार रुपये दान करायचे आहेत. परंतु, सुतक असल्यामुळे मी देवळात जाऊ शकत नाही.
तरी तुम्ही माझ्याकडील २ हजार रुपये घ्या आणि तुमच्या आत्म्याला व गळ्यातील सोन्याच्या साखळीला लावून कोणालाही दान करा.” त्याने त्याच्याकडील दोन हजार रुपये फिर्यादीच्या हातात दिले आणि गोड बोलून गळ्यातील सोनसाखळी काढायला लावली.
दिलेले दोन हजार रुपये आणि सोनसाखळी फिर्यादीकडून परत घेऊन त्या साखळीला पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये गुंडाळले आणि ती पुडी प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये टाकून ती बॅग फिर्यादीकडे दिली. “घरी जाऊन ती पुडी उघडा,” असे म्हणून तो तिथून पळाला आणि काही अंतरावर उभ्या असलेल्या दुचाकीवर मागे बसून निघून गेला.
फिर्यादीने ती पुडी उघडून पाहिल्यावर त्यात ८० हजार रुपयांची सोनसाखळी नव्हती. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करीत आहेत.
