शनिवारी ठरणार आमदार : मतमोजणीची उत्सुकता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणुकीची चुरस यंदा वाढली ती लाडकी बहिण योजनेमुळे. आता या बहिणी काय करतात, ते उद्याच कळेल. पुण्यात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. पण विजयाचा गुलाल कोण उधळणार याविषयी कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू होईल आणि तासाभरात विजयाचा अंदाज जाहीर होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येऊ शकतो. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत ५६.१६ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ४९.०५ टक्के मतदान झाले होते. तब्बल ६.११ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला असून हे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
पर्वती मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाजपच्या तीन वेळच्या विजेत्या उमेदवार माधुरी मिसाळ, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या अश्विनी कदम, आणि अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. त्यामुळे पर्वतीत यंदा अटीतटीचा सामना रंगला आहे.
काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले आबा बागुल यांना पडणारी मते कोणाच्या पथ्यावर पडणार, हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे. खडकवासला मतदारसंघात चुरशीच्या लढतीत कमळ फुलणार, तुतारी वाजणार की इंजिन सुसाट धावणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
खडकवासल्यात ५६.५२ टक्के वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजपचे भीमराव तापकीर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सचिव दोडके आणि मनसेकडून उभे असलेले मयुरेश वांजळे यांनी कडवे आव्हान दिले आहे.
त्यामुळेच खडकवासल्यात कांटे की टक्कर झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बारामतीत सर्वाधिक चुरस असेल. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. युगेंद्र पवार यांच्या मागे आजोबा शरद पवार यांची रणनीती आहे.
नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी, महायुती यामुळे सुरुवातीला मतदारांच्या मनात कोणाला मतदान करायचे आणि का करायचे? असा संभ्रम होता. मात्र, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आणि लाडकी बहिण योजना लक्षवेधी ठरली. त्यातच निवडणूक आयोगाबरोबरच विविध सामाजिक संघटनांनी केलेली मतदान जनजागृती प्रभावी ठरली.
नवमतदारांचा उत्साह वाढला आणि यंदा मतदानाचा टक्का ५.१७ टक्क्यांनी वाढला.
