वैमनस्यातून केले कृत्य : रामटेकडीतील घटनेत दोघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूर्व वैमनस्यातून महाविद्यालयात जात असलेल्या युवकावर दोघांनी कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. रामटेकडी येथील जामा मस्जिदीसमोर मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
यश घाटे (वय १७, रा. अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत प्रज्वल घाटे (वय २०, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहिल शेख (वय १८) आणि ताहीर खलील पठाण (वय १८, रा. सर्व्हे नंबर ११०, रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे.
ही घटना रामटेकडी येथील जामा मस्जिदसमोर मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी यांचा भाऊ यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयश शिंदे हे रामटेकडी येथून कॉलेजला जात होते.
जामा मस्जिद येथे ते आले असताना साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन यश घाटे याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साहिल शेख व ताहीर पठाण यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
