ऋषी राम यांच्या संशोधनाला सर्वोत्तम पेपरचा मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) एमसीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ऋषी राम यांचा कायदा आणि न्याय विषयावरील संशोधन पेपर सर्वोत्तम संशोधन पेपर म्हणून निवडला गेला आहे.
कायदा आणि न्याय: कायदेशीर व्यवस्थेतील निष्पक्षतेची आव्हाने शोधणे हे त्यांच्या पेपर चे शीर्षक होत. हा शोधनिबंध कायदा आणि न्यायाच्या उत्क्रांतीचा अभ्यास दर्शविणारा आहे. प्राचीन, पूर्व तसेच समकालीन कायदेशीर प्रणाली, कायदेशीर मजकूर, न्यायिक भूमिका इत्यादींचा अभ्यास या शोध निबंधात करण्यात आला आहे.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या सद्य संरचनेला आकार देण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते महत्त्वपूर्ण निर्णय आणि कार्य, ऐतिहासिक टप्पे आणि समकालीन आव्हानांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
कायदा आणि न्याय कसा विकसित झाला आहे याची सर्वांगीण समज प्रदान करणे हा अभ्यासाचा उद्देश आहे तसेच पुढील सुधारणांसाठी भविष्यातील दिशा काय असू शकतात हा उहापोह या अभ्यासाचा भाग आहे.
भारतीय शिक्षण मंडळ युवा आयाम च्या वतीने व्हिजन फॉर विकसीत भारत VIVIBHA २०२४ हि राष्ट्रीय-स्तरीय शोधनिबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील विद्यार्थी आणि अभ्यासकांचा सहभाग होता. राष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण संशोधन, अंतर्दृष्टीपूर्ण विश्लेषण आणि उत्कृष्ट लेखन कौशल्य याच्या आधारे संशोधन पेपर चे परीक्षण केले गेले.
निवड झालेल्या संशोधकांना भारतीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील संशोधक परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळेल आणि प्रतिष्ठित संस्थांमध्ये संशोधन करण्याची संधीही मिळेल.
संशोधन पेपर लेखनाच्या थीममध्ये कायदा आणि न्याय, राष्ट्रीय सुरक्षा; कला, साहित्य आणि संस्कृती; भारतीय ज्ञान प्रणाली; स्त्री: सक्षमीकरणाची दृष्टी; ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान; ग्रामीण विकास आणि स्वयंरोजगार, वाणिज्य, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन; भारतीय शिक्षण: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य; समृद्ध भारतासाठी इतिहास आणि भारताचे उज्ज्वल भविष्य आणि पर्यावरण संवर्धनाकडे योग्य दृष्टी इत्यादी विषय स्पर्धेकरिता देण्यात आले होते.
ऋषी राम यांचे अतुलनीय परिश्रम आणि उत्कृष्ट संशोधनात्मक लेखन या बद्दल प्रा डॉ संजय बी चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
