कोंढव्यातील घटना, अडीच महिन्यांनंतर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सावत्र वडिलांकडून होत असलेल्या मारहाणी आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात, त्याची मावशी संगीता राजू बागवे (वय ५१, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावरून विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी कोंढव्यातील लक्ष्मीनगर येथे घडली. पोलीसानी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादींच्या बहिणीने दुसरा विवाह केला होता. त्या वेळी तिची लहान मुले मावशीकडे (फिर्यादीकडे) राहत होती.
मुलं मोठी झाल्यानंतर ती आईकडे राहायला गेली. शब्बीर हा प्लंबिंगचे काम करत असे. विजय कसोटे शब्बीरला वारंवार त्रास देत असे, त्याला मारहाण करत असे आणि त्याच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करत असे.
या सततच्या त्रासाला कंटाळून शब्बीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये सावत्र वडिलांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले होते. या आधारावर पोलिसांनी विजय कसोटे याच्यावर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर या प्रकरणाचा तपास करत आहेत.















