पंतप्रधान कार्यालय तथा केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाला सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पर्यावरण विज्ञान आणि जैव-वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा सन्मान झाला.
प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांनी शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे काम केले आहे. ‘सूर्यदत्त’ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केजी ते पीजी शिक्षण दिले जाते. या संस्थेत संशोधन व प्रशिक्षण केंद्रे, इनोव्हेशन सेंटर आणि पर्यावरणपूरक प्रकल्प राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छ भारत, हरित भारत’, ‘पाणी वाचवा’, ‘प्लास्टिक पुनर्वापर करा’ यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत.
डॉ. चोरडिया यांनी पर्यावरण व जैव-वैद्यकीय क्षेत्रात १०० राष्ट्रीय आणि ५० आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळवले आहेत. त्यांनी १९८३ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसाठी ‘क्वाड्रिसेप्स एक्सर्साइझर अँड नी बेंडर’ प्रणाली विकसित केली. या संशोधनासाठी त्यांचा देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.
‘भारत भाग्य निर्माता परिषद’ या सोहळ्यात शिक्षण व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना कुंभमेळा स्वयंसेवक व कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून सहभागी होण्याचे सुचवले.
“पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा सन्मान केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला, याचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा आणि मध्यप्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत जनजागृती फेरी काढून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले आहे,” असे प्रा. डॉ. चोरडिया यांनी सांगितले.
‘स्वच्छ, हरित, पर्यावरणप्रेमी कॅम्पस’ म्हणून ‘सूर्यदत्त’ची ओळख आहे. प्लास्टिक पुनर्वापर, कचऱ्यापासून खतनिर्मिती, पाणी बचतीसाठी जागृती अभियान यांसारख्या उपक्रमांनी संस्थेने आपला ठसा उमटवला आहे. या सन्मानाने शिक्षण व पर्यावरण क्षेत्रातील ‘सूर्यदत्त’च्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
