सायबर चोरट्यांच्या आमिषाला पडताहेत बळी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर किरकोळ परतावा देत विश्वास संपादन करून, त्यानंतर पैसे भरायला लावून दोन महिलांसह तिघांची २४ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे वर्षाच्या अखेरच्या दिवशी समोर आले आहे.
घरबसल्या पार्ट-टाईम कामाच्या नावाखाली लोकांना टास्क दिले जातात. सुरुवातीला रेटिंग देण्यास सांगून त्यावर लगेच परतावा दिला जातो. यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला जातो. मात्र, नंतर त्यांना पैसे गुंतवून अधिक टास्क पूर्ण करण्यास सांगितले जाते.
जादा पैसे मिळतील असे आमिष दाखवत सायबर चोरटे फसवणूक करतात. असे प्रकार टेलिग्राम ग्रुपद्वारे केले जात असून दररोज अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये नवीन लोक फसत असल्याचे दिसून येत आहे.
वाघोली येथील ४६ वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनोळखी व्यक्तींनी त्यांना पार्ट-टाईम नोकरीचे आमिष दाखवून टास्क पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांची १० लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक झाली.
भेकराईनगर येथील ३३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ऍड करून लिंक पाठवली. टास्क पूर्ण करून किरकोळ परतावा दिला आणि त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर ६ लाख ४५ हजार ५९९ रुपये ट्रान्सफर करण्यास सांगून कोणताही परतावा न देता फसवणूक केली. सय्यदनगर येथील ३६ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विविध मोबाईल नंबरद्वारे त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले.
त्यांच्याशी संपर्क साधून टास्क व डिजिटल शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण ७ लाख ४८ हजार १६५ रुपये ऑनलाईन भरायला लावले. मात्र, गुंतवलेली रक्कम व त्यावरील परतावा न देता फसवणूक केली.
