आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Spread the love

पुणे : पत्नी, सासू, आणि मेव्हणी यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रफुल हरिचंद्र कदम (वय ३५, रा. सत्यम राजयोग, धानोरी) असे आहे. या प्रकरणी प्रफुल यांचे वडील हरिचंद्र गोविंद कदम (वय ६०, रा. सत्यम राजयोग, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्या आधारावर पोलिसांनी प्रफुल यांची पत्नी मृनाली कदम (वय २७), सासू स्वाती सुभाष सकपाळ (वय ५५), आणि मेव्हणी पल्लवी सुभाष सकपाळ

(वय २५, रा. संभाजीनगर, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धानोरी येथील सत्यम राजयोग येथे ही घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल कदम एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांचा मृनाली हिच्याशी २०२० साली विवाह झाला होता.

मात्र, विवाहानंतर मृनाली ही आपल्या आई आणि बहिणीच्या सांगण्यावरून वागू लागली होती, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. प्रफुल हळव्या स्वभावाचे होते. सासरकडून होत असलेल्या वादांचा आणि मानसिक त्रासाचा परिणाम त्यांच्यावर झाला. पत्नी, सासू, आणि मेव्हणी यांच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये पत्नी, सासू, आणि मेव्हणीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले या प्रकरणाचा तपास करत आहेत.