सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी आतिष क्षिरसागर, महिलाध्यक्षा कविता घोडके-पाटील यांची निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना एकत्र आणून राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याचा मानस असल्याचे सरपंच संसदेचे प्रांताध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी सांगितले. राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सोलापूर जिल्हा व सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि कार्यशाळा यावेळी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी गावाच्या विकासासाठी सरपंचांनी केंद्र शासनाच्या निधी स्रोतांपर्यंत पोहोचणे, संघर्षाऐवजी गावातील नागरिक व प्रशासन यांच्यात संवाद प्रस्थापित करणे, आणि सीआरए फंड मिळवणे या तीन उद्दिष्टांसह काम करावे, असे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की राष्ट्रीय सरपंच संसद ही पूर्णतः अराजकीय स्वरूपात कार्य करणारी संघटना असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीही दिल्ली दरबारी आवाज उठवेल. एमआयटी शिक्षण समूहाचे राहुल कराड यांनी २०१७ मध्ये १२०० सरपंचांना एकत्रित करून तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करत संघटनेची स्थापना केली.
त्यानंतरपासून ही संस्था गावच्या विकासासाठी सरपंचांना बळकटी देते आहे. प्रांताध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी सांगितले की, लोकशाहीतील सरपंच हे सर्वात मोठे पद आहे. राज्यात २८,००० ग्रामपंचायती आणि सुमारे पाच लाख पदाधिकारी आहेत.
ही मोठी ताकद असून, सरपंच संसदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित करून सक्षम करणे आवश्यक आहे. प्रशिक्षित लोकप्रतिनिधींमुळेच ग्रामविकास शक्य आहे, त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात उपाध्यक्ष प्रकाशराव महाले आणि नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. व्यक्तिमत्त्व विकासतज्ञ सचीन वायकुळे यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी पाटील यांनी केले, तर आभार नूतन जिल्हाध्यक्ष आतिष क्षिरसागर यांनी मानले.
