आदेश खिंवसरा “जय आनंद मानव सेवा” पुरस्काराने सन्मानीत
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात जय आनंद ग्रुपच्या वतीने रविवारी दि (24 नोव्हेंबर) रोजी पूना मर्चेंट चेंबर चे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ तर समाजसेवक आदेश खिंवसरा यांना ‘जय आनंद मानव सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘आपण अनेक संस्थांशी जोडलेलो असतो अनेक पद्धतीचे कार्य करत असतो. पण ज्या कार्याला समाजदेखील सलाम करतो तेंव्हा खरा सन्मान होतो’, असे प्रतिपादन जीतो एपेक्स चे चेअरमन विजय भंडारी यांनी केले.
जय आनंद ग्रुप च्या वतीने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या सोहळ्यामध्ये व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून कोहिनूर ग्रुप चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, गिरीश शहा, ललित गांधी, जय आनंद ग्रुप’ चे अध्यक्ष पृथ्वीराज धोका उपस्थित होते.
पृथ्वीराज धोका यांनी प्रास्ताविक करताना ग्रुप तर्फे चालविल्या जाणऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावर्षी 25 वा समाजभूषण पुरस्कार दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘जय आनंद ग्रुप’चे अध्यक्ष पृथ्वीराज धोका, कार्याध्यक्ष गणेश कटारिया, सचिव आनंद कोठारी, कोषाध्यक्ष प्रवीण तालेरा, राजेंद्र सुराणा आणि राजेंद्र लुंकड यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्याचे स्वागत केले.
अनिल लुंकड यांनी सूत्रसंचालन केले. अशोक लोढा व गणेश कटारिया यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सचिव आनंद कोठारी यांनी आभार मानले.
‘जय आनंद ग्रुप’ ची स्थापना प. पु. उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांच्या प्रेरणेने 1994 मध्ये झाली. ग्रुपतर्फे दरवर्षी अन्नदान, रक्तदान शिबीर, मोतीबिंदू ऑपरेशन यासह विविध उपक्रम चालतात.
ग्रुपतर्फे हडपसर येथे ‘ऋषि आनंद वन’ या नावाने वृक्षारोपणाचा मोठा प्रकल्प सुरु केला असून तेथे ‘तीर्थंकर विहार’ साकार होत आहे. गेल्या 27 वर्षांपासून समाजातील मान्यवरांना ‘समाजभूषण’ आणि ‘मानवसेवा’ पुरस्कार प्रदान केले जातात.
