पुण्याला मिळणार महत्वाचे स्थान : चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे, राहुल कुल यांना संधी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरुन मते देऊन विक्रमी जागांसह विजयी केले. त्यामुळे आता महायुती तातडीने सत्तेवर येईल, असे लोकांना वाटत होते. परंतु, प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी १३ दिवस वाट पहावी लागली. त्यातही इतक्या दिवसांनंतर केवळ मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचे आझाद मैदानावर जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एका बाजूला सरकार स्थापन झाल्याचा आनंद होत असतानाच आपला नेता मंत्री झाला नाही, त्याचा शपथविधी पाहता आला नाही, याचे मनस्वी दु:खही होते.
आझाद मैदानावर झालेल्या दिमाखदार शपथविधी सोहळ्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत की कोणा कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार. हे संपूर्ण राज्याचे मंत्रिमंडळ असल्याने त्यात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अशा सर्व भागांना चांगले प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांना मिळून करावा लागेल.
त्यामुळे अशा तीन-चार पक्षांचे सरकार अस्तित्वात येताना त्यात अनेक चढ-उतार येत असतात. कधी प्रादेशिक समतोल सांभाळायचा असतो तर कधी एखाद्या पक्षाला विशिष्ट भागात आपला जोर वाढवायचा असतो. त्यामुळे त्या पक्षाकडून एखाद्या भागाला झुकते माप दिले जाण्याची शक्यता असते.
पुण्याला झुकते माप मिळण्याची शक्यता
महायुती सरकारमधील तिन्ही पक्षाचे सर्वच मंत्री विजयी झाल्याने एखादा अपवाद वगळता सर्व मंत्री पुन्हा नवीन मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याचा विचार करता महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अजित पवार आणि भाजपने शरद पवार यांचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत काढले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असणार हे निश्चित आहे. त्याच्या जोडीला मागील मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार हे निश्चित आहे. त्यांच्याबरोबर माधुरी मिसाळ, महेश लांडगे, राहुल कुल यांची नावे निश्चित समजली जातात.
आता महापालिका निवडणुका लवकरच होणार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दृष्टीने महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळण्याची अधिक शक्यता आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून एखादे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातून चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर माधुरी मिसाळ यांना संधी मिळू शकते. तसेच जिल्ह्यातून राहुल कुल व दत्ता भरणे यांची वर्णी लागू शकते. तरुणांना संधी देण्याचा मुद्दा पुढे आल्यास मावळमधील सुनिल शेळके यांना संधी मिळू शकते. शिंदे सेनेच्या शिवसेनेच पुणे जिल्ह्यात फारसे अस्तित्व नाही.
जिल्ह्यात शिवसेनेचे स्थान निर्माण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला तर पुरंदरचे आमदार विजय शिवतरे यांची लॉटरी लागू शकते. त्याचबरोबर भाजपकडून शहरात युवा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संधी देऊ शकतात.
महायुतीचे इतके आमदार निवडून आले की आता त्यातून नेमकी संधी कोणाला मिळेल, हे सांगणे अवघड झाले आहे. आता सरकार अस्तित्वात आल्याने पुढील काही दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाऊन कोणाला कोणते खाते द्यायचे याचे सुत्र ठरवतील. त्यानंतर प्रत्यक्ष खात्यांचे व त्याच्या मंत्र्यांचे खाते निश्चित होणार आहे.
पुण्याचे महत्वाचे प्रश्न सुटण्याची शक्यता
पुरंदर विमानतळ : पुरंदर येथील नियोजित आंतराष्ट्रीय विमानतळाच्या अडचणी काही केल्या सुटत नाही. संरक्षण दलाकडून पुरंदर विमानतळाला अजून मान्यता देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने पुरंदरच्या जागेवर शिक्कामोर्तब केले आहे.
जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत आहे. केंद्रातही महायुतीचे सरकार असल्याने या विमानतळाचा रखडलेला प्रश्न या सरकारच्या काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे.
रिंग रोड : पुणे शहरातील वाहतूकीचा प्रश्न मोठा जटील झाला आहे. त्यामुळे रिंग रोडकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्याची कामेही लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या सरकारचा पायाभूत सुविधांवर भर असणार आहे. त्यामुळे रिंग रोडला निधीची चणचण भासणार नाही. त्यामुळे येत्या काही काळात हा रिंग रोड तयार झालेला आपल्याला पहायला मिळेल.
पुणे – लोणावळा रेल्वे मार्ग : पुणे – लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या लोहमार्गाचा प्रश्न बराच रेंगाळला आहे. तिसऱ्या मार्गाचे काम सुरु आहे. राज्य सरकारने भूसंपादन करुन दिल्यास हा तिसरा मार्ग लवकरच होऊ शकतो. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलल्यास तिसरा व चौथा लोहमार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांना सध्या मनुष्यबळ व साधन सामुग्रीची कमतरता जाणवत आहे. निवडणुकीपूर्वी घाईघाईने सात पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, ही पोलीस ठाणी आहे त्या मनुष्यबळावर सुरु करण्यात आली आहेत. ती अजूनही अधिकृतपणे सुरु झाली नाही की नवीन मनुष्य बळ मिळालेले नाही. ते येत्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल़ त्यात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळाली, हे निश्चित झाल्यानंतर हे महायुतीचे सरकार खऱ्या अर्थाने थांबणार नाही. राज्याचा विकास सुसाट वेगाने व्हावा, हीच जनतेची अपेक्षा राहणार आहे.
नव्या सरकारची पहिली मदत लाडक्या भावाला
शुक्रवारी महायुुतीचे सरकार अस्तित्वात आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली सही केली ती पुण्यातील एका रुग्णाला ५ लाखांची मदत देण्याच्या अर्जाला मंजूर देणाऱ्या प्रस्तावावर. चंद्रकांत कुऱ्हाडे यांना ऑगस्टमध्ये घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. बोन मॅरो ट्रान्सप्लाँट करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी किमान ३० लाख रुपये खर्च येईल असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. कुर्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडे यांनी अनेक देवस्थानांना मदतीचे अर्ज केले. परंतु, अद्याप त्यांच्याकडून ही मदत आली नाही. मागील आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली सही केली ती कुऱ्हाडे यांच्या मदतीच्या अर्जावर ३० लाखांपैकी पाच लाख रुपये एकरकमी मिळणे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचे त्यासाठी लाख लाख आभार, अशी भावना यश कुऱ्हाडे यांनी बोलून दाखविली.
महायुतीला मिळालेल्या यशामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खारीचा वाटा आहे. अडीअडचणीत असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने मदत मिळते. त्यासाठी फक्त एक ऑनलाईन अर्ज करावा लागतो. कोणाचीही शिफारस नाही की कुठला वशिला. रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलमधील रुग्णाच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. गेल्या अडीच वर्षात राज्यभरातील लाखो रुग्णांना त्यातून दिलासा मिळाला आहे. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली सही अशा मदतीच्या अर्जावर करुन ही योजना अशीच पुढे चालू राहील, याची ग्वाही दिली आहे.
