महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. अशा पुस्तक महोत्सवांचे आयोजन केल्यास समाजातील मूल्येही जपली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्रंथांशी आपले नाते फार जुने असून चिरकाल टिकणारे आहे. भारतीय सभ्यतेने जगभरातील ज्ञानाला आत्मसात करण्याची शिकवण दिली आहे.
डिजिटल युगातही आपले ग्रंथ आणि विचार टिकून राहतील. वाचन संस्कृतीला जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.” मुख्यमंत्र्यांनी पुस्तक महोत्सवाचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन करण्याचे सुचवले आणि यासाठी शासनाची साथ असेल, असे आश्वासन दिले.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महोत्सवात विविध दालनांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन प्रकाशक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमात नॅशनल बुक ट्रस्टच्या पुणे कार्यालयासाठी जागा उपलब्ध केल्याबद्दल मनपाच्या आयुक्तांकडून पत्र हस्तांतर करण्यात आले. पुस्तक महोत्सवाच्या संयोजकांनी वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.
