नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने जैन श्रावक संघ, आकुर्डी-निगडी- प्राधिकरण स्थानक भवनाच्या प्रांगणात ह.भ.प. रामायणाचार्य वाणीभूषण पारस महाराज मुथा यांच्या “व्यथा अपेक्षांच्या ओझ्याची, कोमेजलेल्या तारुण्याची” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकुर्डी-निगडी- प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून नितिन ओस्तवाल (ट्रस्टी, साधना सदन स्थानक भवन, पुणे), मीराबाई लुणिया, सूर्यकांत मुथियान, नेनसुख मांडोत, संदेश गादिया, तसेच स्वागताध्यक्षा स्वाध्यायी सुनिता बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली. त्यानंतर संकल्पना शिंगवी यांच्या स्वागतगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नवचैतन्य संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला.
मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर उपस्थितांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. वाणीभूषण पारस महाराज मुत्था यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, “आपण आपल्या प्रपंचिक आयुष्यात मोठ्या प्रमाणात अपेक्षांचे ओझे वाहत आहोत.
या ओझ्यामुळे आपण वाकले आहोत. त्यामुळे आता भगवंताची सेवा करा, आई-वडिलांची सेवा करा. यासारखे सुख समाधान कशातच नाही. जर तुम्ही सेवा केली, तरच तुमची मुलेही तुमची सेवा करतील.”
त्यांनी पुढे सांगितले की, “आई-वडिलांची सेवा करण्यासारखे दुसरे कोणतेही सुख नाही. अवास्तव अपेक्षा करू नका. मुलांच्या विवाहाच्या बाबतीतही अपेक्षा कमी ठेवा. शहर आणि खेडेगावाची तुलना न करता संस्कारांची तुलना करा आणि लग्न ठरवा.
तसेच संत तुकोबारायांच्या भक्ती आणि सेवेचा अंगिकार करा. हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचा, त्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. बाह्य रंगात सुख नाही, तर अंतरंगात खरे समाधान आहे.
आपल्या समाधानी आयुष्याचे निर्माते आपणच आहोत.” या उत्कृष्ट प्रवचनात सु-विचारांची आणि संस्कारांची शिदोरी श्रोत्यांनी श्रवण केली. कार्यक्रमाचे निवेदन शुभांगी कात्रेला यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेखा शिंगवी, राजश्री मेहेर, सुवर्णा नहार, कविता भळगट, निता ओस्तवाल, कल्पना शिंगवी, सुरेखा सांखला, तिलोका डागलिया, प्रमिला कर्णावट यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमासाठी रंजना शिंगवी, जयशिंग्वी, सुरजबाई चोपडा यांची उपस्थिती लाभली.
अशा प्रकारे हे व्याख्यान चैतन्यमय वातावरणात संपन्न झाले.
