गुरु महाराजांच्या सान्निध्यात पारंपरिक ध्वजारोहण, स्नेहभोजन आणि विविध सेवाकार्यांनी अक्षय तृतीया अविस्मरणीय
महाराष्ट्र जैन वार्ता
बार्शी : अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी बार्शी येथील श्री ऋषभदेव जैन मंदिराचा 105 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साध्वीश्री कल्पज्ञा श्रीजी आदी ठाणा ५ यांच्या पावन सान्निध्यात पारंपरिक पद्धतीने मंदिराच्या शिखरावर नवीन ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा ध्वजा चढवण्याचा मान श्री पोपटलाल उत्तमचंद शहा यांना बोलीद्वारे प्राप्त झाला.
या निमित्ताने, स्व. सक्करबाई शिवलाल मुनोत यांच्या स्मरणार्थ पोपटलाल सुमतीलाल कांतीलाल मुनोत परिवारातर्फे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, श्री नवकार जैन सेवा तीर्थ येथे मुक्या जीवांसाठी चारा वितरण व जैन झुणका-भाकरीसह मिठाईचे वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षी, 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीयेला मंदिराचा शताब्दी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला होता. मूळतः 2020 मध्ये मंदिराने 100 वर्षे पूर्ण केली होती, परंतु कोविड-19 महामारीमुळे त्यावेळी महोत्सव साजरा होऊ शकला नव्हता.
यंदाच्या उत्सवात महेंद्रभाई धरमसी, पोपटभाई परमार, शैलेश वखारिया, धन्यकुमार शहा, भरतभाई वखारिया, भरत परमार यांची विशेष उपस्थिती होती. सकल जैन समाज व सर्व शहरवासीयांसाठी सकाळी ९ ते ११ या वेळेत इक्षु रस (ऊसाचा रस) वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. हे सेवा कार्य स्व. हुकमीचंद हेमराज गुंदेचा व स्व. भीकचंद पुनमचंद कटारिया परिवारातर्फे पार पडले.
गुरु महाराजांचे मार्गदर्शन अक्षय तृतीया हा दिवस जैन समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी भगवान ऋषभदेव यांनी आपल्या 400 दिवसांच्या निरंकार निर्जल तपश्चर्येनंतर प्रथमच इक्षु रस ग्रहण करून उपवास सोडला होता. त्यामुळे या दिवशी जैन समाजात विविध धार्मिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती साध्वीश्री कल्पज्ञा श्रीजी यांनी दिली.
या उत्सवाने धार्मिक श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक ऐक्याचा एक अद्वितीय संगम घडवून आणला.
