जैन समाजाच्या सामूहिक सहभागातून ३०० गोवंशांना मिळाली ४०० किलो आमरसाची गोड सेवा
महाराष्ट्र जैन वार्ता
बार्शी : बार्शीतील श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोरक्षण येथे जैन समाजाच्या सौजन्याने एक आगळावेगळा, सेवाभावाने ओतप्रोत भरलेला आणि हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. “गोवंशासाठी आमरस” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात सुमारे २५० ते ३०० गोवंशीय जनावरांना ४०० किलो ताज्या आंब्याचा रस खाऊ घालण्यात आला.
या गोशाळेत कत्तलखान्यातून वाचवलेले, भाकड, वृद्ध व अपंग गोवंशीय पशू प्रेमपूर्वक जतन केले जातात. ही संस्था बार्शी शहरात शिस्तबद्ध व्यवस्थापन, संवेदनशीलता व सेवाभावासाठी ओळखली जाते.
या उपक्रमाची थेट प्रेरणा आणि सुरुवात झाली ती पुणे येथील श्री राजेशभाई चंद्रकांतभाई शाह (₹ ६,०००/) आणि मुंबईचे चंद्रेशभाई हसमुखलालभाई शाह (₹ ५,०००/) यांच्या सेवाभावातून.
या दोन्ही देणगीदारांनी बार्शीतील अध्यक्षांशी संपर्क साधत विचारले, “आपण गोवंशांना आमरस खाऊ घालतान का? आम्ही मिळून ₹ ११,०००/- पाठवतो.”
त्यांचा हा प्रेमळ संदेश व सेवाभाव समाजाच्या WhatsApp ग्रुपवर पोहोचताच, जणू समाजातच नवचैतन्य संचारले. त्यानंतर बार्शीतील जैन समाजातील युवकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला, आणि “आपलाही खारीचा वाटा असावा” या सेवाभावातून आर्थिक तसेच प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. दहा ते पंधरा मोकळ्या पटांगणांमध्ये गव्हाण ठेवण्यात आल्या होत्या.
त्या गव्हाणांमध्ये हा ताज्या आंब्याचा आमरस भरून, गोवंशांना खाऊ घालण्यात आला. या सोहळ्यादरम्यान “गोमाता की जय” आणि “महावीर स्वामी भगवान की जय” अशा भक्तिमय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोरक्षणचे अध्यक्ष धन्यकुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली झाले. तसेच संस्थेचे ट्रस्टीगण प्रदीप बागमार, संदीप सुराणा, पवन श्रीश्रीमाळ, गोविंद बाफना, भरत परमार, कमलेश मेहता, राजेश बंबोली, पदम कांकरिया, गोरक्षणाचे सेवक बाळासाहेब ओहाळ यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
संस्थेचे पदाधिकारी म्हणाले, “या उपक्रमाची सुरुवात जरी दोन व्यक्तींनी केली असली, तरी त्यातून उभा राहिलेला समाजाचा प्रतिसाद हा जैन समाजाच्या एकतेचे व सेवाभावाचे सर्वोत्तम उदाहरण ठरतो.” बार्शी शहरातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, सेवाभाव, सामाजिक ऐक्य आणि श्रद्धेचा संगम ‘गोवंशासाठी आमरस’ या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला आहे.
